धाराशिव : “आमच्यासोबत लग्न कर, नाहीतर तुझी बदनामी करू,” अशा धमकीला आणि त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळू तुकाराम पंडित (वय २५, रा. लिटलस्टार शाळेजवळ, बँक कॉलनी, धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बाळूने १७ जून २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जहागिरदारवाडी येथील रेल्वेच्या बोगद्यात रेल्वे रुळावर उडी घेऊन आपले जीवन संपवले.
याप्रकरणी मयताची आई राधा तुकाराम पंडित (वय ५०) यांनी २३ जून रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, इर्शाद इसाक सय्यद (रा. पोलीस लाईन, धाराशिव) आणि नसरीन फिरोज मजकुरे (रा. मिली कॉलनी, धाराशिव) हे दोघे बाळू याला त्रास देत होते. “आमच्यासोबत लग्न कर, अन्यथा समाजात तुझी बदनामी करू,” अशी धमकी ते सतत देत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळूनच आपला मुलगा बाळू याने आत्महत्या केली, असे आईने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
राधा पंडित यांच्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी इर्शाद सय्यद आणि नसरीन मजकुरे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२),(३) आणि ३(५) अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
आईच्या फिर्यादीतील धक्कादायक आरोप
बाळू तुकाराम पंडीत (वय २५, रा. बँक कॉलनी, धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बाळू हा ‘सिध्दीविनायक जेंट्स पार्लर’ नावाचे केशकर्तनालय चालवत होता. दि. १७ जून २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास, जहागीरदारवाडी येथील रेल्वेच्या बोगद्यात रेल्वे रुळाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला होता. याबाबतची माहिती स्थानिक नगरसेवक राजाभाऊ पवार यांनी पंडीत कुटुंबीयांना दिली होती. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद (क्र. ३१/२०२५) करण्यात आली होती.
मृत बाळूची आई, राधा तुकाराम पंडीत (वय ५०), यांनी दि. २३ जून रोजी पोलिसात दिलेल्या जबाबानुसार, बाळूचे जवळचे मित्र मानले जाणारे १) इर्शाद इसाक सय्यद आणि २) नसरीन फिरोज मजकुरे हे त्याच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत.
त्यांच्या फिर्यादीनुसार:
- इर्शाद सय्यद आणि नसरीन मजकुरे हे दोघेही बाळूचे खूप जवळचे मित्र होते.
- हे दोघेही बाळूवर त्यांच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते.
- लग्न करण्यास नकार दिल्यास समाजात बदनामी करू, अशी धमकी ते देत होते. या त्रासाबद्दल बाळूने अनेकदा आपल्या आईला सांगितले होते.
- राधा पंडीत यांनी या दोघांनाही आपल्या मुलाचा नाद सोडण्यासाठी वारंवार समजावले होते, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
या दोघांच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच बाळूने १७ जून रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० च्या दरम्यान आत्महत्या करून आपले जीवन संपवले, असे फिर्यादीत म्हटले आहे. आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल इर्शाद सय्यद आणि नसरीन मजकुरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राधा पंडीत यांनी केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.