धाराशिव: बेंबळी येथील एका खाजगी डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे प्रकृती बिघडल्याचा आरोप करत एका रुग्णाने आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यानेच खाजगी डॉक्टरला पाठीशी घालत असल्याची आणि आपली बाजू ऐकून न घेता मानसिक खच्चीकरण करत असल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी चौकशी अधिकारी बदलून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी रुग्णाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
रुईभर येथील रहिवासी असलेले आकाश गोरोबा चव्हाण यांनी हा तक्रार अर्ज दिला आहे. अर्जानुसार, १ जून २०२५ रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते बेंबळी येथील खाजगी डॉक्टर सुधीर झिंगाडे यांच्याकडे उपचारासाठी गेले होते. मात्र, झिंगाडे यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला, असा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना धाराशिव येथील डॉ. भारत माने यांच्या दवाखान्यात नऊ दिवस उपचार घ्यावे लागले, आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली.
या घटनेनंतर चव्हाण यांनी १३ जून २०२५ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या चौकशीसाठी धाराशिवचे तालुका वैद्यकीय अधिकारी गिरी यांची नेमणूक करण्यात आली.
चौकशी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
आकाश चव्हाण यांच्या आरोपानुसार, चौकशी अधिकारी गिरी यांनी चौकशीदरम्यान त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांकडे का गेला होता? आता त्यांच्याकडूनच चौकशी करून घ्या,” असे म्हणत त्यांनी दरडावले. याचा राग मनात धरून गिरी यांनी २३ जून रोजी बेंबळी येथे चौकशीदरम्यान डॉ. झिंगाडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.
“१०० मधून एका रुग्णाला असा त्रास होतो, तुमच्या तक्रारीचा काहीही उपयोग होणार नाही,” असे म्हणून गिरी यांनी आपले मानसिक खच्चीकरण केले, असे चव्हाण यांनी अर्जात म्हटले आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निःपक्ष चौकशीची शक्यता नसल्याने, त्यांनी हा चौकशी अधिकारी बदलून दुसरा अधिकारी नेमावा, अशी विनंती केली आहे. या अर्जाच्या प्रती आरोग्य संचालक, पुणे आणि उपसंचालक, लातूर यांच्यासह जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.