चंद्रभागेच्या काठावरचा, पंढरीचा आसमंत… काळ्या-सावळ्या विठुरायाच्या देवळाचा कळस सोन्याच्या किरणांनी न्हाऊन निघत व्हता. चंद्रभागेचं पाणी शांत व्हतं, जणू काही आबाळाचं आरिसंच. पर आज पंढरीच्या वाऱ्यात त्यो नेहमीचा गारवा नव्हता. कसला तरी उमाळा, कसली तरी खंत दाटून आली व्हती.
असाच एक भला माणूस, नाव त्याचं ‘नाम्या’. मराठवाड्यातील कुठल्याश्या गावचा. हाडाचा शेतकरी, काळवटलेल्या जमिनीसारखाच त्याचा रंग, पण मनात विठ्ठलाचा जप. दरवर्षी न चुकता आषाढी-कार्तिकीची वारी करणारा. नाम्या आज सकाळधरनं देवळाच्या पायरीवर बसून व्हता. डोळं विठ्ठलाच्या गाभाऱ्याकडं लागलं व्हतं, पन मन गावच्या वाटेनं फिरत व्हतं. गावातली जात-पात, भांडण-तंटे, पैशासाठी होणारी लुटालूट, गरिबांवर होणारा अन्याय… हे सगळं आठवून त्याच्या जीवाची घालमेल व्हत व्हती.
“काय रं नाम्या, आज असा गपगार कसा? माझ्या दारात येऊन बी तोंडावर उदासी?”
नाम्या दचकला. आवाज तर ओळखीचा व्हता, जणू काळजात बसून कुणीतरी साद घातली. त्यानं वर बघितलं, तर समोर पितांबर नेसलेला, गळ्यात तुळशीची माळ घातलेला, कपाळावर चंदनाचा टिळा लावलेला विठ्ठल उभा! होय, साक्षात विठ्ठलच! नाम्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.
“आरं, रडतोस काय खुळ्यावानी? अरे, मनात काय हाय, ते तरी बोल की! मी काय अंतर्यामी नाय व्हय?” विठ्ठलानं त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.
नाम्या हुंदके आवरत बोलला, “देवा, काय सांगू तुला? तू तर सगळं जाणतोस. गावात माणसं माणसासारखी वागत न्हाईत रं! जातीवरून एकमेकांचा जीव घ्यायला उठल्यात. पैशासाठी सख्खा भाऊ पक्का वैरी झालाय. गरिबाची पोर-बाळ उपाशी, अनं मोठं-मोठं पुढारी लोकांच्या पैशावर डल्ला मारत्यात. बायका-लेकींची अब्रू लुटली जातीया. सगळाच भ्रष्टाचार अनं अत्याचाराचा बाजार मांडलाय. मग कशाला करायची ही वारी? कशाला घ्यायचं तुझं नाव?”
विठ्ठल हसला. त्याचं हसणं म्हणजे जणू काय चाफाच फुलला. तो नाम्याच्या बाजूला पायरीवर बसला आणि बोलू लागला, “नाम्या, तू म्हणतोस ते खरं हाय. जग बदललं, माणसं बदलली. पन, माणसाने माणसाशी कसं वागावं, हे काय मी वेगळं सांगायची गरज हाय व्हय?”
“अरे, ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा’. माझा तुकोबा हेच सांगून गेला ना रं? अरे, माणसात देव बघायला शिका. जो दुबळा हाय, जो पिचलेला हाय, त्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवा. त्येच्या तोंडातला घास काढून खाऊ नका, तर आपल्या घासातला घास त्याला द्या. तीच खरी माझी भक्ती.”
विठ्ठल क्षणभर थांबला. त्याचा आवाज आता रांगडा झाला व्हता, जणू काही गावाच्या पारावरचा एखादा जाणता माणूसच बोलत व्हता.
“अनं हे जाती-पातीचं खुळ डोक्यातनं काढून टाका रं! अरे, रक्ताचा रंग सगळ्यांचा एकच हाय. कुणी उगाच मोठा न् कुणी लहान न्हाय. सावत्या माळ्याच्या भाजीत, चोख्या मेळ्याच्या ढोरात, जनाबाईच्या दळणात, अन् नाम्याच्या कीर्तनात मी सारखाच हाय. ज्याच्या मनात भेदाभेद आला, त्येच्यासाठी मी नाय. जो सगळ्यांना आपलं मानतो, त्येच्यासाठी मी विटेवर उभा हाय.”
“आता राहिला प्रश्न भ्रष्टाचाराचा,” विठ्ठल जरा गंभीर झाला. “अरे, ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी’. नीतिनं कमवा, माणुसकीनं जगा. दुसऱ्याचं लुटून बंगले बांधले, तर त्यात सुख लागत न्हाय रं. त्ये बंगल्यात झोप येत न्हाय. त्यापेक्षा गरिबाच्या झोपडीत चटणी-भाकर खाऊन घेतलेली शांत झोप लय मोलाची हाय.”
“अन्याय करणारा जेवढा पापी, तेवढाच तो सहन करणारा बी हाय. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. एकटे असाल, तर दहा जणांना सोबत घ्या. पण गप्प बसू नका. सत्याच्या वाटेनं चालाल, तर काटे लागतील, ठेचा लागतील, पण शेवट गोडच व्हईल. मी तुमच्या सोबत हाय, पन तुम्ही बी तुमच्यातल्या माणुसकीला जागं ठेवा.”
विठ्ठलाच्या प्रत्येक शब्दात जणू काही हजारो अभंगांचं सार एकवटलं व्हतं. नाम्याला आपला मार्ग सापडला व्हता. त्याच्या डोळ्यातलं पाणी आता थांबलं व्हतं, अनं तिथं एक नवी चमक आली व्हती.
तो उठून उभा राहिला, विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं. “देवा, तू माझे डोळे उघडलेस. आता गावात जाऊन तू सांगितलेलं हेच ‘माणुसकीचं भजन’ सुरू करतो. बघतोच, कसा बदल होत न्हाय ते!”
विठ्ठल पुन्हा एकदा मायाळूपणे हसला. “तथास्तु! अरे, माणसातला देव जागा झाला, की मग जातीवाद, भ्रष्टाचार, अत्याचार हे सगळं आपोआपच संपून जातं रं! फक्त एकमेकांना जीव लावा, एकमेकांना समजून घ्या. माझी खरी वारी तीच हाय.”
एवढं बोलून विठ्ठल देवळाच्या गाभाऱ्यात दिसेनासा झाला. नाम्या आता एकटाच व्हता, पण त्याच्या मनात हजारो वारकऱ्यांचं बळ आलं व्हतं. चंद्रभागेची झुळूक आता त्याला वेगळाच दिलासा देत व्हती. तो ताठ मानेनं, नव्या विचारानं आपल्या गावाच्या वाटेला लागला होता. कारण आता त्याला कळलं व्हतं, की माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं, हीच विठ्ठलाची खरी पूजा हाय.
- सुनील ढेपे