धाराशिव – लाचखोरीच्या गंभीर आरोपाखाली रंगेहाथ पकडले गेलेले धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती निवृत्ती शेळके आणि महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांना अखेर पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्र आणि धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या आदेशाने ही निलंबनाची कारवाई आज, शुक्रवार, दि. २७ जून २०२५ रोजी करण्यात आली.
आनंदनगर पोलीस ठाण्यात दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७(अ), आणि १२ अन्वये गुन्हा (गु.र.नं. २३५/२०२५) दाखल असल्याने ही प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
एका ४८ वर्षीय महिलेच्या मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ९५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. यानंतर पीडित महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली.
ACB ने सापळा रचून, २५ जून रोजी धाराशिवच्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात, महिला पोलीस नाईक मुक्ता लोखंडे यांना तक्रारदार महिलेकडून ९५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल निरीक्षक शेळके यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली.
थरारक पलायननाट्य आणि अटक
या प्रकरणाला नाट्यमय वळण तेव्हा लागले, जेव्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना बुधवारी रात्री निरीक्षक शेळके यांनी ACB अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. काही काळ चाललेल्या फिल्मी पाठलागानंतर, ACB च्या पथकाने अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या. यानंतर गुरुवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
या निलंबनाच्या कारवाईमुळे लाचखोर पोलीस निरीक्षक शेळके आणि महिला पोलीस नाईक लोखंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.