धाराशिव | दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार व पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. या कॅन्डल मार्चमध्ये आमदार कैलास पाटील यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.
यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे भूमिका मांडताना, विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकारने बळाचा वापर केल्याने लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले आहे. तसेच आंदोलनातील विद्यार्थी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता पारदर्शक चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिवमध्ये नागरिक, विद्यार्थी व विविध संघटनांचे प्रतिनिधी कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.





