वाशी : तालुक्यातील ईसरुप येथे शेतजमिनीच्या जुन्या वादातून एकाच कुटुंबातील अकरा जणांनी मिळून एका व्यक्तीसह त्याच्या पत्नी व मुलांना काठी आणि दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तब्बल १९ दिवसांनी पीडित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी दत्तात्रय भास्कर जाधवर (वय ५१, रा. ईसरुप, ता. वाशी) यांचा त्यांच्याच नातेवाईकांसोबत शेतीचा वाद सुरू आहे. याच वादातून दिनांक १४ जुलै २०२५ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली. फिर्यादी दत्तात्रय जाधवर, त्यांची पत्नी सुरेखा, मुलगा कृष्णा आणि मुलगी शिवकन्या यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच, जीवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी दत्तात्रय जाधवर यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बप्पासाहेब भागवत जाधवर, संदीपान भागवत जाधवर, विलास भागवत जाधवर, धनु विलास जाधवर, प्रभावती बप्पासाहेब जाधवर, प्रकाश संदीपान जाधवर, शोभा प्रकाश जाधवर, प्रयागाबाई विलास जाधवर, संतोष त्रिंबक जाधवर, त्रिंबक भागवत जाधवर आणि सुभाबाई संदीपान जाधवर (सर्व रा. ईसरुप, ता. वाशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाशी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२),(३), १८९(२), १९१(२),(३), आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील इतक्या व्यक्तींवर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.