उमरगा: उमरगा तालुक्यात शेतीच्या वादातून मारहाण झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. गाय बांधण्याच्या कारणावरून एका वृद्धाला विळा आणि काठीने गंभीर मारहाण करण्यात आली, तर शेतातून जाण्याच्या वादातून दुसऱ्या एका तरुणावर कत्तीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या दोन्ही प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गाय बांधण्याच्या वादातून वृद्धाला मारहाण
कोळेवाडी येथील रहिवासी भगवान मारुती पालमपल्ले (वय ७२) यांना गावातीलच व्यंकट विठोबा पालमपल्ले याने गायी बंधाऱ्यावर बांधण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी, विळा व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास कोळेवाडी शिवारातील सर्वे नंबर १७ मध्ये घडली. याप्रकरणी जखमी भगवान पालमपल्ले यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून आरोपी व्यंकट पालमपल्ले याच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ११५(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेतातून जाण्यावरून कत्तीने हल्ला
दुसऱ्या घटनेत, नाईचाकुर येथील रहिवासी विष्णू गोविंद माने (वय ३३) यांना गावातीलच ईश्वर उर्फ लिंबराज पांडुरंग माने आणि पांडुरंग बळीराम माने या दोघांनी मारहाण केली. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिरेवाडी शिवारातील गट नंबर १०/२ मध्ये शेतातून जाण्याच्या कारणावरून आरोपींनी विष्णू माने यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी आणि कत्तीने मारहाण केली. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विष्णू माने यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यात क्षुल्लक कारणांवरून कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढले असून, पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.