उमरगा: जमिनीची रजिस्ट्री करून देण्याच्या कारणावरून एका व्यक्तीला व त्याच्या वडिलांना काठीने व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना उमरगा तालुक्यातील कोळसूर येथे घडली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील महिलांसह एकूण सात जणांवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोळसूर शिवारातील कॅनल जवळ ही घटना घडली. फिर्यादी एकनाथ हणमंत गुरव (वय ४७, रा. कोळसूर) यांना आरोपींनी अडवून जमिनीची रजिस्ट्री करून देण्याचा तगाडा लावला. यावरून वाद निर्माण झाला असता, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून एकनाथ गुरव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, तसेच काठी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले.
इतकेच नव्हे तर, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीचे वडील हणमंत गुरव यांनाही आरोपींनी मारहाण केली आणि दोघांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी एकनाथ गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोळसूर तांडा येथील आरोपी चंपाबाई गोपाळ जाधव, विमल गुरुनाथ जाधव, संगिता राजेंद्र जाधव, मनिषा संतोष जाधव, किरण झापु जाधव, आकाश गुरुनाथ जाधव आणि संतोष विठ्ठल जाधव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.






