धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हयात भाजपने वर्चस्व सिद्ध करत धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरूम या चारही नगर परिषदांवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. दुसरीकडे, या निकालामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
या निकालानंतर जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
‘केवळ रिलस्टार असून चालत नाही’ – राणा पाटलांचा टोला
नगर परिषदांवर वर्चस्व मिळवल्यानंतर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. निकालावर प्रतिक्रिया देताना राणा पाटील म्हणाले की, “राजकारणात केवळ ‘बोल बच्चन’गिरी करून आणि सोशल मीडियावर ‘रिलस्टार’ होऊन चालत नाही, तर लोकांसाठी जमिनीवर उतरून काम करावे लागते.” अशा शब्दांत त्यांनी खासदार निंबाळकरांना डिवचले आहे.
‘तुमचं कर्तृत्व काय?’ – ठाकरे गटाचे प्रत्युत्तर
राणा पाटलांच्या या टीकेचा शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. पाटलांना प्रत्युत्तर देताना जाधवर म्हणाले की, “राणा पाटील यांनी विजयानंतर फार हवेत उडू नये. हे विजय तुमच्या नेतृत्वामुळे नव्हे, तर स्थानिक नेत्यांच्या ताकदीमुळे मिळाले आहेत.”
जाधवर यांनी निकालाचे विश्लेषण करताना स्थानिक नेत्यांची नावे घेतली. ते म्हणाले, “तुळजापूर पिटू गंगणे, नळदुर्ग सुनील चव्हाण, मुरूम बापूराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे तर धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि खलिफा कुरेशी (राष्ट्रवादी शरद पवार ) यांच्यात झालेल्या मत विभागणीमुळे भाजपचे कमळ फुलले आहे. . यात तुमचे स्वतःचे कर्तृत्व काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या निकालामुळे धाराशिव जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढली असली तरी, राणा पाटील आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.







