धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर पालिकांच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. या पराभवानंतर आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहित पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच, हा निकाल कार्यकर्त्यांच्या मनाला वेदना देणारा असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
पराभवाची जबाबदारी स्वीकारली
निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना आमदार कैलास पाटील यांनी सर्वप्रथम धाराशिव आणि कळंब नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले. “लोकशाहीमध्ये जनतेचा कौल अंतिम असतो आणि तो आम्ही पूर्णपणे मान्य करतो,” असे सांगत त्यांनी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. जनतेच्या निर्णयाचा आपण विनम्रपणे स्वीकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाव
निवडणुकीत शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचा उल्लेख करताना पाटील भावूक झाले. ते म्हणाले, “आमच्या कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घेतली, घराघरात जाऊन पक्षाची भूमिका पोहोचवली. सर्वसामान्य घरातील, निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका होती. मात्र, आजचा निकाल हा अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाव घालणारा ठरला आहे. हा निकाल निराशाजनक आणि मनाला वेदना देणारा आहे, हे नाकारता येणार नाही.”
‘संघर्ष हीच आपली ओळख’
पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. “पराभव हा शेवट नाही. आपण आत्मचिंतन करू, चुका शोधू आणि आवश्यक त्या सुधारणा करून पुन्हा नव्या उमेदीने मैदानात उतरू. संघर्ष हीच आपली ओळख आहे आणि त्यातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू,” असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.







