परंडा: धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक निमित्ताने परंडा तालुक्यात झालेल्या एका जाहीर सभेत माजी मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते आमदार तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याच घरात ठेवण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारा सावंत यांनी दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
काय म्हणाले तानाजी सावंत?
सभेत बोलताना तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणावरून अप्रत्यक्षपणे राणा पाटलांना लक्ष्य केले. ते म्हणाले, “जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अट्टाहासाने ‘ओपन महिला’ आरक्षण पाडून, ते आपल्याच घरात घेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी चंग बांधला आहे, त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय मी राहणार नाही.”
सावंत यांनी आपला इरादा स्पष्ट करताना पुढे सांगितले की, “धाराशिव जिल्हा परिषदेवर धनुष्यबाणाचाच (शिवसेनेचा) अध्यक्ष बसविण्याचे स्वप्न मी बघतोय. तानाजी सावंत हा आभासी जगात जगणारा नेता नाही. आपली स्वप्ने कृतीत उतरवण्याचा माझा इतिहास आहे, त्यामुळे मी हे छातीठोकपणे सांगत आहे.”
महायुतीत ठिणगी पडणार?
राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) सत्तेत एकत्र असले तरी, धाराशिवमधील स्थानिक राजकारणात मात्र या दोन नेत्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तानाजी सावंत यांनी थेट भाजप आमदारांच्या मनसुब्यांवरच हल्लाबोल केल्याने, आगामी काळात जिल्हा परिषदेवरून भाजप आणि शिवसेनेत तणाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सावंतांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याचे संकेत मिळत आहेत.







