धाराशिव: तुझी लायकी आहे का? असे म्हणत एका १८ वर्षीय तरुणाच्या तोंडावर थुंकून, त्याला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील घाटांग्री येथे घडली आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ॲट्रासिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी संकेत विलास कांबळे (वय १८, मूळ रा. शेकापूर, सध्या रा. घाटांग्री) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास घाटांग्री येथील गणेश वस्ती भागात घडली. संकेत कांबळे तिथे असताना गावातील सुहास शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना गाठले.
आरोपींनी संकेत यांच्या तोंडावर थुंकून, “तुझी लायकी आहे का?” असे म्हणत त्यांचा अपमान केला. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी कोयता आणि लोखंडी गजाने संकेत यांच्यावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
आरोपींची नावे:
या प्रकरणी संकेत कांबळे यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. सुहास शिंदे २. अजय सतिश हराळे ३. विकास तानाजी हराळे ४. गोविंद होनमाने ५. महादेव होनमाने ६. सिद्धनाथ बिचकुले ७. वैभव राजू थोरात ८. धनाजी सलगर ९. पिंटू शिंदे (सर्व रा. घाटांग्री, ता. जि. धाराशिव)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन धाराशिव ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रासिटी ॲक्ट) कलम ३(१)(आर), ३(१)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.




