नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील धर्मवीर संभाजीनगर भागात एकाच रात्री दोन बंद घरांचे कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ईश्वर अशोक जाधव (वय ४४) आणि त्यांचे शेजारी मैनोद्दीन बाबूलाल बागवान (दोघे रा. धर्मवीर संभाजीनगर, जळकोट) यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे २:३० ते ५:०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घरांच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.
चोरीला गेलेला मुद्देमाल:
१. ईश्वर जाधव यांच्या घरातून: घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम १ लाख ७८ हजार रुपये आणि एक मोबाईल फोन.
२. मैनोद्दीन बागवान यांच्या घरातून: रोख रक्कम ५० हजार रुपये, ३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ११ तोळे चांदीचे दागिने.
असा दोन्ही घरांतून मिळून एकूण २,९८,२५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
या प्रकरणी ईश्वर जाधव यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) (घरफोडी) आणि ३०५ (चोरी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.



