मुंबई/धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांनी मुंबईत भेट घेतली. या बैठकीत, “भाजपने पळवलेले शिवसेनेचे दोन सदस्य आधी परत करावेत, तरच त्यांच्याशी सत्ता स्थापनेची पुढील बोलणी केली जाईल,” अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तसेच, भाजपसोबत वाटाघाटी करण्याचे सर्वाधिकार आता आ. तानाजी सावंत यांना बहाल करण्यात आले आहेत.
सत्ता स्थापनेवरून घोडे अडले; राणा पाटलांवर गंभीर आरोप


नुकत्याच झालेल्या धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे अध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतःची पत्नी सौ. अर्चना पाटील यांना अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, अपक्ष आणि शिवसेनेचे दोन असे एकूण ३१ सदस्य कोकण दौऱ्यावर पळवून नेल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होत आहे. या प्रकारावर आ. तानाजी सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त करत, “मित्र पक्षाचे दोन सदस्य पळवून नेणे हाच युतीधर्म आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
धाराशिव जिल्हा परिषद पक्षीय बलाबल:
-
भाजप: १८
-
शिवसेना (शिंदे गट): १५ (यापैकी ८ सदस्य तानाजी सावंत गटाचे)
-
शिवसेना (ठाकरे गट): ८
-
राष्ट्रवादी (अजित पवार गट): ६
-
अपक्ष: ४
-
काँग्रेस: ३
-
समाजवादी पक्ष: १
तानाजी सावंत ठरले ‘किंग मेकर’
सध्याच्या संख्याबळानुसार आ. तानाजी सावंत हे धाराशिव जिल्हा परिषदेच्या राजकारणात ‘किंग मेकर’च्या भूमिकेत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या सदस्यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय बहुमताचा आकडा गाठणे कठीण आहे. हीच बाब ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेडपी अध्यक्षपदाचा आणि भाजपसोबतच्या युतीचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आ. सावंत यांच्याकडे सोपवले आहेत.
खोट्या बातम्या पेरण्याचा डाव?
दुसरीकडे, आमदार राणा पाटील यांच्या गटाकडून माध्यमांमध्ये युतीसंदर्भात खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप सावंत गटाकडून होत आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून अध्यक्षपदावर ठाम दावा केला जात असल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे.
आता जोपर्यंत शिवसेनेचे ते दोन सदस्य परत दिले जात नाहीत, तोपर्यंत भाजपशी कोणतीही बोलणी न करण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे महायुतीमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. धाराशिवच्या या राजकीय नाट्यात आता नेमके काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.






