‘घोषणासम्राट’ आमदार राणा पाटील यांच्या पोकळ घोषणांच्या ‘सुपरहिट’ मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे! आजचा विषय आहे धाराशिव जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा – कृष्णेचं पाणी!
राजकारणात एक अलिखित नियम आहे: विधानसभा निवडणूक जवळ आली की शेतकऱ्यांना ‘कृष्णा खोऱ्याच्या पाण्याचे गाजर’ दाखवायचे. साहेबांनीही हा नियम अगदी तंतोतंत पाळला आहे.
४ नोव्हेंबर २०२२ ची ती ‘तुफान’ पोस्ट आणि स्वप्नांचा पूर:


जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. साहेबांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये अशी काही भन्नाट पोस्ट टाकली होती की, ती वाचून धाराशिवच्या कोरड्या पडलेल्या नद्यांनाही आनंदाने घाम फुटला असेल! त्यांनी अगदी छातीठोकपणे जाहीर केलं होतं: “मार्च २०२४ अखेर कृष्णेचे पाणी जिल्ह्यात खळखळणार!”
या पोस्टमध्ये साहेबांनी फेकलेल्या ‘गुगली’ची काही ठळक वैशिष्ट्ये बघा:
-
आकड्यांचा पाऊस: ११,७२६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता आणि पहिल्या टप्प्यात ७ टीएमसी पाणी! (सध्या हे पाणी फक्त कागदावरच वाहतंय).
-
कॉर्पोरेट स्टाईल नियोजन: साहेबांनी थेट ‘NICMAR’ कंपनी आणून ‘विकली प्लॅनिंग’ (Weekly Planning) आणि ‘दर १५ दिवसांनी आढावा’ घेण्याची भन्नाट घोषणा केली होती.
-
अधिकाऱ्यांना दम: “कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या कालावधीत पाणी आलेच पाहिजे!” (बिचारे अधिकारी… ते पण साहेबांसारखेच कॅलेंडर विसरले असावेत).
-
निधीची कमी नाही: कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही आणि निधीची कमतरता भासू देणार नाही, असा ‘शब्द’ दिला होता.
आता मार्च २०२६ आलाय… पाणी कुठेय?
आता जरा वास्तवात या. साहेबांनी दिलेली ‘मार्च २०२४’ ची डेडलाईन उलटून गेली, आता मार्च २०२६ डोक्यावर आलंय. पण कृष्णेचं पाणी जिल्ह्यात खळखळण्याऐवजी साहेबांच्या घोषणाच हवेत खळखळत आहेत.
नक्की पाणी कुठे अडकलंय? कुठल्या टोल नाक्यावर ट्रॅफिक जॅममध्ये? की साहेबांचं ते ‘विकली प्लॅनिंग’ असलेलं रजिस्टरच कुठेतरी हरवलंय? युनिफॉर्म घालून अधिकाऱ्यांसोबत घेतलेले फोटो आणि पत्रकारासोबत केलेला पाहणी दौरा, या सगळ्याचं पुढे काय झालं?
निवडणुकीचं गाजर आणि जनतेचा सवाल:
दरवेळी निवडणुका आल्या की ‘शाश्वत पाण्याचं’ स्वप्न विकायचं, मोठेमोठे आकडे फेकायचे, सत्कार करून घ्यायचे आणि एकदा खुर्ची मिळाली की पुढची पाच वर्षे ‘पाण्यावर रेघ’ ओढायची, हा पॅटर्न आता धाराशिवच्या जनतेला पाठ झाला आहे. शेतकरी आजही कोरड्या रानात आभाळाकडे आणि कोरड्या कालव्यांकडे डोळे लावून बसलाय.
त्यामुळे आता धाराशिवची जनताच एक सुरात विचारतेय- “राणा पाटील साहेब, आणखी किती दिवस आम्हाला हे कृष्णा खोऱ्याच्या पाण्याचे गाजर दाखवून वेड्यात काढणार?”





