‘घोषणासम्राट’ आमदार राणा पाटील यांच्या पोकळ घोषणांच्या ‘सुपरहिट’ मालिकेच्या चौथ्या भागात तुमचं स्वागत आहे! आतापर्यंत आपण बसवसृष्टी, जंगल सफारी आणि कृष्णेचं पाणी हवेत कसं जिरलं ते पाहिलं. पण आजचा विषय जरा ‘गंभीर’ आणि साहेबांच्या ‘दूरदृष्टी’ची खरी ओळख करून देणारा आहे.
कारण इथं नुसत्या घोषणा नाहीत, तर इथं आहे शेतकऱ्यांना गोड स्वप्नं दाखवून त्यांच्या जमिनींवर डल्ला मारण्याचा थेट ‘मेगा प्लॅन’!
२५ मे २०२५ ची ती ‘हॉलीवूड’ लेव्हलची स्क्रिप्ट आणि ‘तारा’ (TARA) प्रोजेक्ट:
मे २०२५ मध्ये साहेबांनी तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा आणि मसला शिवारात १००० एकर क्षेत्रावर ‘तुळजाई कृषी उत्पन्न वृद्धी अभियान (TARA)’ नावाचा असा काही भव्य प्रकल्प जाहीर केला, की इलॉन मस्कलाही धडकी भरावी!
या पोस्टमधल्या साहेबांच्या ‘फँटसी’ बघा:
-
दीडपट उत्पन्न: विज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न थेट दीडपट वाढवणार! (कसं? ते साहेबांनाच माहीत).
-
भव्यदिव्य उद्योग: १००० एकरात ‘मेगा फूड पार्क’, ‘लेदर पार्क’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक हब’!
-
सर्वांत मोठा विनोद – अणुऊर्जेचा कांदा!: केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणे ‘अणुऊर्जेचा’ वापर करून कांदा साठवणूक केंद्र उभारणार! (म्हणजे आता तुळजापूरचा कांदा थेट युरेनियमच्या सानिध्यात राहणार! साहेबांच्या डोक्यात कल्पनांचा नुसता ‘स्फोट’च होत असतो!)
-
मोठी नावे: सह्याद्री फार्म्स, ग्रँड थॉरटन (Grand Thornton), मित्र (MITRA)… नावांची नुसती खैरात!
आता ‘क्रोनोलॉजी’ समजून घ्या (खरा उद्देश काय?):
आता फेब्रुवारी २०२६ चालू आहे. या १००० एकरात इलेक्ट्रॉनिक हब सोडा, साधा बल्ब लावायला खांब तरी उभा राहिलाय का? नाही! मग हा एवढा मोठा खटाटोप कशासाठी?
याचं उत्तर साहेबांनीच त्यांच्या पोस्टमध्ये चुकून देऊन ठेवलंय – “येत्या काळात याच परिसरातून सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे जाणार आहे. तसेच सुरत-चेन्नई महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग देखील येथून जवळच असल्याने ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे.”
हाच तर खरा खेळ आहे! शेतकऱ्यांना ‘दीडपट’ उत्पन्नाचे आणि ‘अणुऊर्जेचे’ गोड स्वप्न दाखवायचे. हायवे आणि रेल्वेमुळे भाव खाणाऱ्या या मोक्याच्या जमिनी ‘प्रकल्पाच्या’ नावाखाली कवडीमोल भावाने लाटायच्या. एकदा जमिनी पदरात पडल्या की प्रकल्पाचा ‘डीपीआर’ (DPR) कागदावरच गुंडाळून ठेवायचा! जिल्ह्यात याआधीही अशाच प्रकारे कितीतरी ठिकाणी जमिनी लाटल्या गेल्याचा इतिहास आहे.
शेतकरी उद्योजक व्हावा हा हेतू नसून, हायवेच्या कडेच्या जमिनींचा ‘उद्योजक’ होण्याचा हा सगळा डाव आहे. साहेब शेतकऱ्यांच्या जीवनात ‘आमूलाग्र बदल’ घडवायला निघालेत, पण तो बदल ‘जमीनमालक’ ते ‘भूमिहीन’ असा तर नसेल ना, अशी शंका आता या माळुंब्रा आणि मसला शिवारातील शेतकऱ्यांना येऊ लागली आहे.







