धाराशिव : शहरातील खिरणीमळा भागात कत्तलीच्या उद्देशाने चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची शहर पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे दोन लाख १७ हजार रुपये किमतीची जनावरे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी एका तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १९) रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील खिरणीमळा परिसरात काही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी तिथे गोवंशीय जातीची १० कालवड, वासरू व खोंड आणि एक जर्सी गाय अशी एकूण ११ जनावरे आढळून आली. या जनावरांना चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयीपणे आणि बेकायदेशीररीत्या बांधून ठेवले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख १७ हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. या प्रकरणी मुसाविर मतीन कुरेशी (वय २५, रा. आझाद चौक, कुरेशी गल्ली, धाराशिव) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कत्तलीच्या उद्देशाने जनावरांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी सरकारतर्फे शहर पोलिसांनी मुसाविर कुरेशी याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम कलम ११ (१) (ब), तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम ५ (अ) अन्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.







