धाराशिव – शासकीय कामात कसुरी आणि वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाने धाराशिव जिल्ह्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कडक पाऊल उचलले आहे. ‘सेवा प्रवेशोत्तर परीक्षा-२०२४’ च्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी गैरहजर राहिल्याबद्दल या अधिकाऱ्यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ६ आणि ७ मार्च २०२६ रोजी सेवा प्रवेशोत्तर परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम आयोजित करण्यात आले होते. या कामासाठी विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील खालील तीन अधिकारी या महत्त्वपूर्ण कामाला अनुपस्थित राहिले:
१. श्री. अनंत कुंभार (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धाराशिव)
२. श्री. प्रशांतसिंह मरोड (गट विकास अधिकारी, पं.स. उमरगा)
३. श्री. लक्ष्मण वाजे (गट विकास अधिकारी, पं.स. भूम)
नियमबाह्य वर्तन आणि कारवाईचा इशारा
विभागीय आयुक्तांनी नोटिसीमध्ये नमूद केले आहे की, या अधिकाऱ्यांनी गैरहजर राहण्यापूर्वी कार्यालयाची कोणतीही पूर्वसंमती घेतली नव्हती. ही कृती शासकीय सेवेतील शिस्तीला बाधा आणणारी आणि बेजबाबदारपणाची आहे. यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम (३) चा भंग झाल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत.
पगार कपातीची शक्यता?
या गैरहजेरीमुळे संबंधित अधिकाऱ्यांची त्या दिवसांची रजा ‘असाधारण रजा’ (विनावेतन) म्हणून का मानली जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. यावर २१ मार्च २०२६ पर्यंत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रस्तावित कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.
या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.






