धाराशिव : भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीची माहिती मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिल्यानंतर धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मल्हार पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये, “भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमचे सहकारी श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केलेल्या आत्मीय सत्काराचा स्वीकार केला. या प्रसंगी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक बळकट करण्याबाबत तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली,” असे म्हटले आहे.
दरम्यान, या भेटीनंतर माजी शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी फेसबुकवर केलेली सूचक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. गुरव यांनी, “औमदादानी कामाला लावलं, कधी नाही ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जायची वेळ आली… #गाठीभेटी” अशी टिप्पणी केली आहे.
गुरव यांच्या या पोस्टचा थेट रोख नेमका कुणाकडे आहे, याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला नसला तरी मल्हार पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या भेटीनंतर ही पोस्ट आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
धाराशिव जिल्ह्यात आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या ‘गाठीभेटी’ वाढल्या आहेत का? आणि गुरव यांच्या सूचक पोस्टमागे नेमका काय राजकीय संदर्भ आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे.
दरम्यान, या पोस्टमुळे सोशल मीडियावरही राजकीय समर्थकांमध्ये प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.







