धाराशिव: जिल्ह्यात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, शेतपिकांसह वाहनांची चोरी झाल्याचे तीन वेगवेगळे प्रकार समोर आले आहेत. तुळजापूर, उमरगा आणि वाशी पोलीस ठाण्यात याप्रकरणी सोमवारी (दि. २३ मार्च) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची कॉपर वायर, हरभऱ्याचे कट्टे आणि एका हॉटेल मालकाची दुचाकी असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
तुळजापूर: शेततळ्यावरून ९३२ मीटर कॉपर वायर लंपास
तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील देवसिंगा साठवण तलावाजवळून शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी झाली आहे. फिर्यादी जगन्नाथ आप्पाराव नरवडे (वय ५३) यांच्यासह इतर गावातील शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारीची तब्बल ९३२ मीटर कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी पळवली. २२ ते २३ मार्चच्या दरम्यान ही घटना घडली असून, या वायरची अंदाजे किंमत ६५,२४० रुपये आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरगा: शेतातून हरभऱ्याचे २७ कट्टे चोरीला
उमरगा तालुक्यातील नाईकचाकूर शिवारात रोडलगत असलेल्या शेतातून थेट शेतीमालच चोरीला गेला आहे. शेतकरी राम गुंडा घाटे (वय ६५) यांच्या मालकीचे अंदाजे ६५,००० रुपये किंमतीचे हरभऱ्याचे २७ कट्टे अज्ञात व्यक्तीने २१ ते २२ मार्चच्या रात्रीत चोरून नेले. याप्रकरणी राम घाटे यांच्या प्रथम खबरेवरून उमरगा पोलीस ठाण्यात BNS कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वाशी: हॉटेलवरील कामगारानेच पळवली मालकाची दुचाकी
वाशी तालुक्यातील ईट येथे हॉटेलवर काम करणाऱ्या कामगारानेच मालकाची दुचाकी चोरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फिर्यादी तेजस विलास भोरे (वय २५, रा. वडवणी, जि. बीड) यांची अंदाजे ७०,००० रुपये किंमतीची दुचाकी (क्र. MH 23 BL 7712) त्यांचाच कामगार कल्याण शिवाजी माळी (रा. कर्जणी, जि. बीड) याने १९ मार्च रोजी हॉटेलसमोरून पळवून नेली. याप्रकरणी तेजस भोरे यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात आरोपी कामगाराविरुद्ध BNS कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







