धाराशिव: सेवा प्रवेशोत्तर परीक्षा-२०२४ च्या उत्तरपत्रिका तपासणीला दांडी मारल्याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाने बजावलेली ‘कारण दाखवा’ नोटीस आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ही नोटीस ‘चुकून’ आल्याचा दावा केल्याने प्रशासकीय वर्तुळात नवा पेच निर्माण झाला असून, नेमकी चूक कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय आहे नवीन वळण?
या प्रकरणात नाव आलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी खळबळजनक दावा केला आहे. “सदर नोटीस चुकून पाठवण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मुळात मला उपस्थित राहण्याचे कोणतेही आदेशच नव्हते,” असे कुंभार यांनी स्पष्ट केले. यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाची अधिकृत नोटीस आणि प्रत्यक्ष आदेश यामध्ये ताळमेळ नसल्याचे चित्र समोर येत आहे.
सीईओ मैनाक घोष यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मैनाक घोष यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “आम्हाला देखील या प्रकरणाची माहिती वृत्तपत्रांतूनच मिळाली आहे. सदर प्रकरण विभागीय आयुक्त स्तरावर सुरू आहे. त्यांच्या कार्यालयाकडून पुढील अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतरच आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.”
प्रशासकीय समन्वयावर प्रश्नचिन्ह
विभागीय आयुक्त कार्यालयाने २ मार्च २०२६ रोजी आदेश काढून ६ व ७ मार्च रोजी तपासणीचे काम निश्चित केले होते. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही नोटिशीत देण्यात आला होता. मात्र, आता अधिकाऱ्यांनी ‘आदेशच नव्हते’ असा पवित्रा घेतल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाचा कारभार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाने काढलेली नोटीस खरोखरच तांत्रिक चुकीमुळे निघाली होती की अधिकाऱ्यांचा दावा केवळ बचाव करण्यासाठी आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या वादावर आता विभागीय आयुक्त कार्यालयाकडून येणाऱ्या अधिकृत स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









