तुळजापूर : तालुक्यातील बारूळ शिवारात एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील जनावरांच्या खाद्यात अज्ञात माथेफिरूने जाणीवपूर्वक विषारी औषध मिसळल्याचा अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. या विषबाधेमुळे तीन दुभत्या गायींचा मृत्यू झाला असून, अन्य चार गायींवर सध्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय उमराव शेलार (वय ४१, रा. होनाळा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचे बारूळ शिवारात गट क्रमांक १६/२ मध्ये शेत आहे. या शेतातील गोठ्यामध्ये त्यांनी आपल्या जनावरांसाठी ‘नेचर डिलाईट’ कंपनीचा मका भरडा आणि सुग्रास आणून ठेवला होता. जनावरांना ठार मारण्याच्या आणि शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान करण्याच्या खोडसाळ उद्देशाने अज्ञात व्यक्तीने या पोत्यांमधील खाद्यामध्ये कोणते तरी अज्ञात विषारी औषध मिसळले.
हे विषारी खाद्य नेहमीप्रमाणे गोठ्यातील सात दुभत्या गायींना खाण्यास दिले असता, त्यांना थोड्याच वेळात गंभीर विषबाधा झाली. या दुर्दैवी घटनेत तीन गायींचा तडफडून मृत्यू झाला. तर, उर्वरित चार गायींची प्रकृतीही बिघडली असून त्यांच्यावर सध्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मुक्या जनावरांचा जीव घेणाऱ्या या अमानुष प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेप्रकरणी शेतकरी विजय शेलार यांनी सोमवारी (ता. ३०) तुळजापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन सविस्तर फिर्याद दिली. त्यांच्या या प्रथम खबरीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. शेतकऱ्याचे नुकसान करण्याच्या उद्देशाने हा क्रूर प्रकार नेमका कोणी आणि का केला, याचा कसून तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.




