तुळजापूर: दहा ग्रॅम सोने देण्याचे आमिष दाखवून दोन अनोळखी भामट्यांनी एका ५६ वर्षीय महिलेची फसवणूक केल्याची घटना तुळजापूर शहरात उघडकीस आली आहे. सोन्याचा मुलामा दिलेली लोखंडी पट्टी देऊन या भामट्यांनी महिलेच्या कानातील तब्बल २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातोहात लांबवले आहेत. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता रवींद्र तांबे (वय ५६, रा. कुंभारी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. अनिता तांबे या सोमवारी (ता. ६ एप्रिल) सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालयासमोरील फुटपाथवर थांबल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले.
या भामट्यांनी अनिता यांना बोलण्यात गुंतवून १० ग्रॅम सोने देण्याचे आमिष दाखवले. भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून अनिता यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर या भामट्यांनी सोनेरी रंग दिलेली एक लोखंडी पट्टी सोन्याची असल्याचे भासवून अनिता यांच्या हातावर ठेवली आणि त्या बदल्यात अनिता यांच्या कानातील सोन्याची फुले व झुमके (वजन अंदाजे ४.८ ग्रॅम, किंमत २७ हजार रुपये) काढून घेतले. दागिने हाती लागताच या दोन्ही भामट्यांनी तेथून पोबारा केला.
हातातील पट्टी सोन्याची नसून लोखंडाची असल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनिता तांबे यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.







