राजकारण आणि बॉलिवूडचे सिनेमे यात फारसा फरक नसतो. त्यातल्या त्यात धाराशिवच्या राजकारणाला तर कायमच एक ‘थ्रिलर’ टच असतो. गेल्या काही वर्षांपासून धाराशिवच्या राजकीय पडद्यावर एका सुपरहिट जोडीची चर्चा होती, ती म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील! राजकारणातले हे ‘जय-वीरू’ एकाच गाडीवरून फिरतायत, एकमेकांसाठी जीव द्यायला तयार आहेत, असेच चित्र होते. पण आता या ‘शोले’ सिनेमात एक भन्नाट ट्विस्ट आलाय… जय आणि वीरूची जोडी फुटलीये!
ही जोडी कशी बनली आणि कशी फुटली, याची कहाणी एखाद्या वेबसिरीजला लाजवेल अशीच आहे. चला, जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया…
पहिली पिढी आणि ‘पुत्रप्रेमाचा’ उमाळा
गोष्ट सुरू होते जुन्या पिढीपासून. कैलास पाटलांचे वडील ॲड. बाळासाहेब पाटील, ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर आणि जीवनराव गोरे हे तिघेही एकेकाळचे जिवलग मित्र. हे तिघेही शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि अनेक वर्षे मंत्री राहिलेले डॉ. पद्मसिंह पाटील यांचे निष्ठावान शिलेदार. जीवनराव गोरे जिल्हा परिषद अध्यक्ष, बाळासाहेब पाटील तेरणा कारखान्याचे चेअरमन तर पवनराजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष… सगळा कारभार कसा एकदम ‘गुण्यागोविंदाने’ सुरू होता.
पण राजकारणात घराणेशाहीची एंट्री झाली नाही, तर ते राजकारण कसले? २०१९ च्या निवडणुकीपूर्वी कैलास पाटील राष्ट्रवादीत होते. त्यांना सारोळा गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी हवी होती. पण राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे यांना अचानक ‘पुत्रप्रेमाचा उमाळा’ आला. त्यांनी कैलास पाटलांचा पत्ता कट करून स्वतःचा लेक आदित्य गोरेला तिकीट दिले.
जय-वीरूची भेट आणि ‘शिवसेनेचा वाघ’
तिकीट कापल्याचा राग मनात धरून कैलास पाटील थेट ओमराजे निंबाळकर यांच्या संपर्कात आले. ओमराजेंनी त्यांना अखंड शिवसेनेत आणले. कैलास पाटलांनी जिल्हा परिषद जिंकली, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले आणि पुढे २०१९ च्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या संजय निंबाळकरांचा करेक्ट कार्यक्रम करत ते पहिल्यांदा आमदारही झाले. इथेच या ‘जय-वीरू’ जोडीची खऱ्या अर्थाने पायाभरणी झाली.
२०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत भूकंप घडवला, तेव्हा कैलास पाटीलही गुवाहाटीच्या प्रवासासाठी ‘सुरत एक्सप्रेस’मध्ये बसले होते. पण तिथे त्यांना मातोश्रीची (आणि ओमराजेंची) साद ऐकू आली. ते सुरतहूनच माघारी फिरले. ओमराजेंनीच त्यांना परत आणल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. या ‘सुरत रिटर्न’ प्रकारामुळे उद्धव ठाकरे जाम खूश झाले. त्यांनी थेट ओमराजे आणि कैलास पाटील यांना “माझे वाघ” अशी पदवी देऊन टाकली!
मशाल पेटली, पण ‘निधी’चं पाणी पडलं!
२०२४ ची लोकसभा आणि विधानसभा… दोघांनीही ठाकरेंच्या ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवली आणि दोघेही जिंकले. आता हे दोघे ठाकरेंचे सर्वात निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. पण राजकारणात निष्ठा आणि ‘निधी’ यांचं नेहमीच वाकडे असते.
अचानक ओमराजेंना साक्षात्कार झाला की, “निधी मिळत नाही, कामे होत नाहीत.” मग काय, त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकत थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उडी मारली. इकडे ‘वीरू’ने (कैलास पाटील) आपल्या ‘जय’ला (ओमराजे) थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. “मित्रा, नको जाऊ…” असा टाहो फोडला, पण ओमराजेंनी ठरवले होते, ते शिंदेंच्या गोटात गेलेच. कैलास पाटलांनी मात्र, “मी ठाकरेंसोबतच राहणार” असा बाणेदारपणा दाखवला.
आता लक्ष रविवारी… दोस्ती आड येणार का?
ओमराजेंनी पलटी मारल्यामुळे धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. याच डॅमेज कंट्रोलसाठी स्वतः उद्धव ठाकरे उद्या (रविवारी) धाराशिवच्या दौऱ्यावर येत आहेत.
आता मजा अशी आहे की, ओमराजे शिंदेंकडे गेले असले तरी कैलास पाटील अद्याप त्यांच्याविरुद्ध आक्रमक झालेले नाहीत. त्यांच्या अंगात अजून ‘ठाकरी बाणा’ संचारलेला दिसत नाही. कारण स्पष्ट आहे… राजकारण जरी बदलले असले, तरी ‘दोस्ती’ आड येत आहे!
रविवारी उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये येऊन ओमराजेंवर कोणती तोफ डागणार? आणि आपल्या शांत बसलेल्या ‘वाघाला’ (कैलास पाटील) डरकाळी फोडायला लावणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात काय, तर धाराशिवच्या राजकारणाचा हा नवा सीझन खूपच रंजक वळणावर आला आहे. बघूया, रविवारी काय ‘स्फोट’ होतोय ते!
– सुनील ढेपे
धाराशिव लाईव्ह







