धाराशिव: थायलंड या देशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून धाराशिव जिल्ह्यातील एका २२ वर्षीय तरुणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी फसवणूक आणि अपहरण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात सायबर एजंटांनी फेसबुकवरील जाहिरातीच्या माध्यमातून या तरुणाला जाळ्यात ओढले, त्याचे अपहरण करून त्याला थायलंडमध्ये डांबून ठेवले आहे. इतकेच नव्हे तर, तिथे त्याचा छळ करत त्याच्याकडून बळजबरीने ‘ऑनलाईन फ्रॉड’ (सायबर गुन्हे) करून घेतले जात आहेत. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुकवरील जाहिरात ठरली सापळा
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर हरिश्चंद्र गरड (वय २५ वर्षे, रा. खेड, ता. जि. धाराशिव) यांचा २२ वर्षीय लहान भाऊ अनिकेत हरिश्चंद्र गरड हा नोकरीच्या शोधात होता. १ मे २०२६ रोजी त्याला फेसबुकवर (Facebook) परदेशात नोकरी संदर्भात एक आकर्षक जाहिरात दिसली.
या जाहिरातीच्या आधारे अनिकेतने तिथे दिलेल्या अज्ञात मोबाईल क्रमांकावर (8562052678915) संपर्क साधला. संबंधित मोबाईल धारकाने आणि त्याच्या अज्ञात एजंट साथीदारांनी संगणमत करून अनिकेतला “थायलंड या देशात खूप चांगला जॉब आणि मोठी सॅलरी मिळेल,” असे आमिष दाखवले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अनिकेत नोकरीसाठी रवाना झाला.
थायलंडमध्ये नेऊन केले अपहरण; छळ करून करून घेतात सायबर गुन्हे
१ मे २०२६ ते ३ जुलाई २०२६ या कालावधीत आरोपी एजंटांनी अनिकेतची पूर्णपणे फसवणूक केली. त्याला थायलंडमध्ये नेल्यानंतर त्याचा पासपोर्ट व कागदपत्रे काढून घेत त्याचे अपहरण करण्यात आले. त्याला एका अज्ञात ठिकाणी डांबून (ओलीस) ठेवण्यात आले आहे.
तिथे अनिकेतचा अमानुष मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असून, आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीसाठी त्याच्याकडून बळजबरीने ऑनलाईन फ्रॉड आणि सायबर फसवणुकीची कामे करून घेतली जात आहेत. भाऊ संकटात असल्याचे आणि त्याला परदेशात डांबल्याचे समजताच खेड येथील गरड कुटुंबाला मोठा धक्का बसला.
धाराशिव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल; आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा लावण्याचे आव्हान
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच ज्ञानेश्वर गरड यांनी ३ जुलै २०२६ रोजी थेट धाराशिव सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारक आणि एजंटांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२७(२), १२७(४) (अपहरण/डांबून ठेवणे), १४३ (मानवी तस्करी), ३१८(४) (फसवणूक), ६१(२) (गुन्हेगारी कट रचणे) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परदेशात अडकलेल्या धाराशिवच्या तरुणाची सुटका करण्यासाठी सायबर पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने पुढील तपास करत आहेत.
सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
फेसबुक, टेलिग्राम किंवा इतर सोशल मीडियावर ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ‘परदेशात नोकरी’ अशा मोठ्या पगाराच्या आमिषांना बळी पडू नका. कोणत्याही अनोळखी एजंटला पैसे किंवा कागदपत्रे देण्यापूर्वी कंपनीची अधिकृतता तपासून घ्या. संशय आल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा.






