महाराष्ट्राच्या मातीत अनेक परंपरा जन्माला आल्या, रुजल्या आणि काळाच्या ओघात अधिक समृद्ध झाल्या. पण शेकडो वर्षे अखंडपणे चालत आलेली आणि लाखो माणसांना एका धाग्यात बांधणारी परंपरा म्हणजे पंढरीची वारी.
वारी म्हणजे केवळ आळंदी किंवा देहूहून पंढरपूरकडे निघालेला पायी प्रवास नाही. वारी म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ आहे. येथे कोणतीही फी नाही, परीक्षा नाही आणि पदवीही नाही. पण वारीतून मिळणारे जीवनाचे शिक्षण कोणत्याही पुस्तकात सहज मिळणार नाही.
वारी आपल्याला सर्वप्रथम समता शिकवते.
दिंडीत चालताना कोण श्रीमंत आणि कोण गरीब, कोण मोठा अधिकारी आणि कोण सामान्य शेतकरी, याचा भेद राहत नाही. प्रत्येकाच्या कपाळी बुक्का, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखी एकच नाम असते—
‘ज्ञानोबा माऊली… तुकाराम!’
वारीत माणसाची ओळख त्याच्या पदावरून किंवा पैशावरून होत नाही. तो ‘वारकरी’ असतो. एकमेकांना ‘माऊली’ म्हणण्याची परंपरा ही केवळ हाक नाही; ती समतेची शिकवण आहे. समोरच्या प्रत्येक माणसात माऊली पाहण्याचा संस्कार आहे.
वारी आपल्याला संयम शिकवते.
ऊन असो, पाऊस असो… पायाला फोड आले तरी वारकरी चालत राहतो. मुक्कामाची गैरसोय असली, जेवण साधे असले तरी त्याच्या चेहऱ्यावर तक्रार नसते. कारण त्याच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय असते—पंढरीचा विठ्ठल.
आजच्या धावपळीच्या जीवनात थोडीशी अडचण आली तरी आपण अस्वस्थ होतो. अपेक्षेप्रमाणे काही घडले नाही की निराश होतो. वारी मात्र सांगते—ध्येय निश्चित असेल तर अडचणींची चिंता करू नका; चालत राहा.
वारी आपल्याला शिस्त शिकवते.
लाखो वारकरी एकाच मार्गाने चालतात. हजारो दिंड्या असतात. टाळ-मृदंगाचा गजर असतो. तरी या जनसागरात एक विलक्षण शिस्त दिसते. कोणतीही सक्ती नाही, हातात दंडुका घेऊन उभा असलेला शिक्षक नाही. तरी प्रत्येक वारकरी परंपरेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करतो.
मनापासून स्वीकारलेली शिस्त ही कायद्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रभावी असते, हे वारी दाखवून देते.
वारी आपल्याला सेवा शिकवते.
वारीच्या मार्गावर कुणी पाणी वाटतो, कुणी अन्नदान करतो. कुणी वारकऱ्यांचे पाय चेपतो, तर कुणी आरोग्यसेवा देतो. ही सेवा करताना फोटोची अपेक्षा नसते, प्रसिद्धीची हाव नसते.
‘मी कुणासाठी काही केले’ हा अहंकारही नसतो.
कारण वारकऱ्याची भावना एकच असते—माऊलीची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा.
वारी आपल्याला अहंकार सोडायला शिकवते.
आपण आयुष्यभर ‘मी’भोवती फिरत असतो. माझे पद, माझा पैसा, माझी प्रतिष्ठा, माझे यश… पण वारीत हा ‘मी’ कुठेतरी मागे पडतो आणि ‘आम्ही’ जन्माला येतो.
लाखोंच्या गर्दीत आपण एक सामान्य वारकरी बनतो. खांद्याला खांदा लावून चालतो. दुसऱ्याच्या हातातील पाणी पितो. अनोळखी माणसाच्या शेजारी बसून भाकरी खातो.
वारी सांगते—माणूस मोठा त्याच्या पदाने होत नाही; मनाने मोठा होतो.
वारी आपल्याला आनंदाची खरी व्याख्या शिकवते.
पायात महागडे बूट नाहीत. राहण्यासाठी आलिशान हॉटेल नाही. जेवणासाठी पंचपक्वान्न नाही. तरी वारकऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, तो अनेकदा सर्व सुखसोयी असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसत नाही.
का?
कारण आनंद वस्तूंमध्ये नसतो. आनंद समाधानात असतो. आनंद श्रद्धेत असतो. आनंद एकमेकांसोबत चालण्यात असतो.
आज माणूस चंद्रावर पोहोचला. तंत्रज्ञानाने जग हाताच्या तळव्यावर आणले. एका क्लिकवर हजारो गोष्टी उपलब्ध झाल्या. पण माणसामाणसातील अंतर मात्र वाढत चालले आहे.
अशा काळात पंढरीची वारी लाखो माणसांना एकत्र आणते. हातात टाळ देते, मुखात नाम देते आणि पायांना एकच दिशा देते.
पंढरीची वाट!
वारी आपल्याला सांगते—जीवन हेदेखील एक वारीच आहे. प्रत्येकाला आपापला प्रवास पूर्ण करायचा आहे. वाटेत ऊन येईल, पाऊस येईल, पायाला फोड येतील. कधी थकवा येईल, कधी निराशा येईल.
पण थांबायचे नाही.
एकमेकांचा हात धरायचा. गरजूंना आधार द्यायचा. अहंकार बाजूला ठेवायचा. मुखी चांगले शब्द ठेवायचे आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत राहायचे.
कारण शेवटी विठ्ठल केवळ पंढरपूरच्या मंदिरात उभा नाही…
माणसाने माणसात माणूस पाहिला, तर तिथेच विठ्ठल भेटतो.
आणि कदाचित पंढरीची वारी आपल्याला शेकडो वर्षांपासून हेच शिकवत आहे…
‘एकमेकांना माऊली म्हणा… आणि माणूस म्हणून जगा!’
— सुनील मधुकर ढेपे





