कळंब : धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर अशी विषबाधा झालेल्या नर्सेसची नावे आहेत. या घटनेमुळे कळंब शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतपेय प्यायल्यानंतर पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर यांना विषबाधेची लक्षणे जाणवली. पूजा जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे. सध्या लातूर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पल्लवी सौदागर यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.
संत गजानन महाराजांच्या वारीत वाटले जाणार होते शीतपेय
धक्कादायक बाब म्हणजे संबंधित शीतपेय शेगावच्या संत गजानन महाराजांच्या वारीत भाविकांना वाटले जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, शीतपेयाचे वाटप होण्यापूर्वीच दोन नर्सेसना विषबाधा झाल्याची घटना घडली.
या प्रकाराची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक घटनास्थळी दाखल झाले. अन्न व औषध प्रशासन, पोलीस तसेच सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत वारीत वाटपासाठी ठेवण्यात आलेल्या शीतपेयाच्या बाटल्या जप्त केल्या. वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.
शीतपेय कुठून आले? कोण करणार होते वाटप?
संबंधित शीतपेय नेमके कुठून आणण्यात आले होते? संत गजानन महाराजांच्या वारीत त्याचे वाटप कोण करणार होते? शीतपेयामध्ये काही दूषित घटक होते का? तसेच दोन नर्सेसना झालेल्या विषबाधेचे नेमके कारण काय? याचा तपास सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून, जप्त करण्यात आलेल्या शीतपेयाच्या बाटल्यांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे कळंब शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या तपासातून नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






