धाराशिव | राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने मागील तीन दिवसांपासून जय्यत तयारी केली होती. मात्र, मंत्री धाराशिव शहरात येऊनही जिल्हा परिषदेला भेट न दिल्याने सर्व तयारीवर पाणी फेरले गेले.
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेला मंत्री भेट देणार असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी सर्व विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंत्र्यांच्या स्वागतासाठी बैठकीचे नियोजन, सभागृहाची तयारी आणि विविध विभागांचे सादरीकरण तयार ठेवण्यात आले होते.
इतकेच नव्हे, तर जिल्हा परिषद परिसर कधी नव्हे इतका सजविण्यात आला होता. प्रवेशद्वार आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. स्वागतासाठी रांगोळीही काढण्यात आली होती. अधिकारी आणि कर्मचारी मंत्र्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करत होते.
मात्र, जयकुमार गोरे धाराशिव शहरात आले, परंतु त्यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली नाही. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच फजिती झाली असून, तीन दिवसांची तयारी व्यर्थ गेल्याची भावना अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, ग्रामविकास मंत्र्यांनी जिल्हा परिषदेला भेट का दिली नाही, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. या घटनेची जिल्ह्यात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.






