धाराशिव | भाजपचे धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यात पक्षातील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे यांना मंत्र्यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अनिल काळे यांना मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊ दिली नाही, असा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या अनिल काळे यांनी थेट मंत्र्यांचा रस्ता अडवत जाब विचारला.
“मी 35 वर्षे पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करतोय. मंत्री म्हणून तुम्हाला भेटायचं नाही का? आम्हालाच का अडवलं जात आहे?” असा थेट सवाल अनिल काळे यांनी जयकुमार गोरे यांच्यासमोर उपस्थित केला.
या अनपेक्षित घडामोडीमुळे काही काळ मंत्री जयकुमार गोरे निरुत्तर झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. घटनेनंतर परिस्थिती हाताळण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी हस्तक्षेप करत अनिल काळे यांची समजूत काढली आणि झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती आहे.
यावेळी अनिल काळे यांनी आणखी गंभीर आरोप करत, “स्वतः भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच मला मंत्र्यांच्या भेटीपासून रोखले,” असा दावा केला. गेली 35 वर्षे पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करत असूनही मंत्र्यांची भेट घेऊ दिली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या आरोपामुळे उपस्थितांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणावर आपण गप्प बसणार नसल्याचे स्पष्ट करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार राणा पाटील यांच्या विरोधात लिखित तक्रार करणार असल्याचे अनिल काळे यांनी सांगितले.
संपर्कमंत्र्यांच्या दौऱ्यातच घडलेल्या या प्रकारामुळे धाराशिव भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.






