धाराशिव | ‘आपला जीव, धाराशिव व्हिजन 2030‘ या जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावरून धाराशिव जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. ग्रामविकास तथा धाराशिवचे संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या स्वागत फलकांवर आमदार तानाजीराव सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो वगळण्यात आल्याने शिवसेना कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील आणि भाजपच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर केवळ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा फोटो असून, महायुतीतील अन्य प्रमुख नेत्यांना स्थान न दिल्याने हा वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे, अलीकडेच महायुतीत सहभागी झालेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनाही या कार्यक्रमातून दूर ठेवल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे.
या प्रकाराचा निषेध करत शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या सविता (स्वाती) तळेकर यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली. तानाजीराव सावंत समर्थक जिल्हा परिषद सदस्यही कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता ही तानाजीराव सावंत समर्थक 12 सदस्य आणि शिवसेनेच्या 8 सदस्यांच्या पाठिंब्यावर उभी आहे. या पाठिंब्यामुळेच अर्चना पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. असे असताना महायुतीतील प्रमुख नेत्यांनाच प्रसिद्धीपासून दूर ठेवणे हा त्यांच्या समर्थकांच्या मते जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे.
शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी “भाजपला महायुतीचा विसर पडला आहे. आमच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद केवळ होर्डिंगपुरता मर्यादित न राहता महायुतीतील समन्वयावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.
या घडामोडींमुळे संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका काय असेल, तसेच भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाढलेला तणाव कसा मिटवला जाणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, आगामी स्थानिक राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






