पुण्याच्या हॉटेलमधून पळवून आणलेले ते ५ नगरसेवक नक्की कुठे जाणार, या सर्वात मोठ्या सस्पेन्सवरून अखेर पडदा उठला आहे! साहेबांचे (राणा पाटील) आणि भावी खासदारांचे (मल्हार पाटील) ‘ऑपरेशन लोटस’ सपशेल फेल झाले असून, खासदार ओमराजे निंबाळकर यांचे ‘ऑपरेशन टायगर’ मात्र १००% फत्ते झाले आहे! कालपर्यंत भाजपच्या वाटेवर असणारे ४ नगरसेवक आज अधिकृतपणे ‘धनुष्यबाण’ हाती घेऊन शिंदे गटात सामील झाले आहेत.
यात एक भन्नाट ट्विस्ट असा की, ठरलेल्या ५ पैकी पाचवा मोहरा ऐन प्रवेशाच्या वेळी अचानक ‘गायब’ झाला आहे! पण तोही लवकरच ‘शिंदे’ सेनेतच प्रकट होईल, असा पक्का कयास बांधला जात आहे.
मल्हार पर्वाची ‘ट्रोल आर्मी’ उघडी पडली: आपला तो बाळ्या, दुसऱ्याचे कार्टे!
या सगळ्यात सर्वात मोठी कॉमेडी आणि ‘यु-टर्न’ पाहायला मिळतोय तो मल्हार दादांच्या सोशल मीडियावरील ‘ट्रोल आर्मी’चा!
कालपर्यंत हेच बगलबच्चे आणि चमचे सोशल मीडियावर छाती बडवून ‘मल्हार पर्व’च्या नावाने पोस्ट टाकत होते. “पाहा, मल्हार दादांची ताकद! खासदार ओमराजेंच्या नाकावर टिच्चून पाच नगरसेवक फोडले!” अशा वल्गना केल्या जात होत्या. पण जेव्हा हॉटेलमधला राडा झाला आणि हेच नगरसेवक ओमराजेंच्या गळाला लागले, तेव्हा या ‘ट्रोल आर्मी’ची भाषा रातोरात बदलली!
आता हेच चमचे सोशल मीडियावर रडगाणे गात आहेत की, “खासदार ओमराजे यांच्या मामाने प्रत्येकी इतकी-इतकी भलीमोठी रक्कम देऊन हे नगरसेवक फोडले हो!” म्हणजे साहेब आणि मल्हार दादांनी नगरसेवक पळवले तर ती ‘चाणक्यनीती’ आणि ‘मल्हार पर्वाची ताकद’, पण तेच नगरसेवक ओमराजेंनी घेतले तर तो ‘घोडेबाजार’? यालाच म्हणतात- “आपला तो बाळ्या, आणि दुसऱ्याचं ते कार्टं!” या दुटप्पी भूमिकेमुळे आता शहरात साहेबांच्या गोटाची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
अधिकृत बातमी: ठाकरे गटाला भगदाड, ४ नगरसेवक शिंदे सेनेत!
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या अधिकृत पोस्टद्वारे या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची घोषणा केली. धाराशिव नगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप मुंडे, संतोष ऊर्फ नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे आणि केसरबाई ज्ञानदेव करवर (तसेच अमित उंबरे आणि ज्ञानदेव करवर) यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे धाराशिव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सर्वात मोठा राजकीय धक्का बसला आहे. एकाच वेळी नगरपालिकेतील ४ लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्रितपणे पक्ष सोडल्याने ठाकरे गटाचे शहरातील गणित कोलमडले आहे.
दुसरीकडे, या नव्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे धाराशिव शहरात शिवसेना शिंदे गटाची संघटना अधिक मजबूत झाली असून, ओमराजेंनी साहेबांच्या तोंडचा घास हिरावून घेत ‘टायगर’ची खरी डरकाळी फोडली आहे.
थोडक्यात सांगायचे तर, ‘ऑपरेशन लोटस’च्या नादात साहेबांच्या हाती फक्त ‘धपाटे’ आले, आणि ओमराजेंनी आयत्या बिळावर नागोबा करत बाजी मारली! आता ५ वा गायब झालेला नगरसेवक कधी प्रकट होणार आणि साहेब या अपमानाचा बदला कसा घेणार? याकडे संपूर्ण धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.




