धाराशिव: धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील करत आहेत. यासाठी त्यांना राज्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, संपर्कप्रमुख आणि अजित पिंगळे यांची साथ मिळत असून, पिंगळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात शिवसेना संपविण्याचा घाट घातला जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे ॲड. अजित खोत यांनी केला आहे. जर जिल्ह्यातील शिवसेना भाजपवासी करायची नसेल, तर पक्षश्रेष्ठींनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व सोपवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ॲड. खोत यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील घडामोडींवरून भाजप आणि स्थानिक नेत्यांवर तोफ डागली.
एबी फॉर्मचा गैरवापर आणि भाजपचे षडयंत्र


ॲड. खोत म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीत संपर्कप्रमुख साळवी यांनी शिवसेनेचे ‘एबी फॉर्म’ अजित पिंगळे यांच्याकडे दिले होते. मात्र, पिंगळे यांनी ते फॉर्म खऱ्या शिवसैनिकांना देण्याऐवजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्याकडे सोपवले. या माध्यमातून धाराशिव, कळंब आणि तुळजापूर तालुक्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली.
तुळजापूर तालुक्यातील शहापूर मतदारसंघात अण्णा बनसोडे, तर कळंब तालुक्यातील डिकसळ मतदारसंघात पूजा शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. पूजा शिंदे यांचे पती तुषार शिंदे हे भाजपचे कळंब तालुकाध्यक्ष आहेत. धनुष्यबाणावर निवडून आल्यानंतर हे सदस्य पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला न जाता, आपण मल्हार पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगत आहेत. भाजपच्या चिन्हावर निवडून येत नसल्याने पिंगळे यांच्या मदतीने आ. राणा पाटील यांच्या चरणी शिवसेनेचा बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोप खोत यांनी केला.


निष्ठावंतांवर अन्याय आणि विश्वासघात
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला १५ तर भाजपला १७ जागा मिळाल्या. मात्र, शिवसेनेच्या दोन विजयी सदस्यांना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्कारासाठी नेणे अपेक्षित असताना, मित्रपक्ष असलेल्या भाजपने विश्वासघात करून त्यांना पळवून नेल्याचा दावा खोत यांनी केला. तसेच, धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांची उमेदवारी नाकारली होती, परंतु शिवसैनिक आणि पत्रकारांनी आवाज उठवल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली. दुसरीकडे, संदीप मडके आणि नितीन यांच्यासारख्या निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
पालकमंत्री सरनाईकांवर निधी कपातीचा आरोप
जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपातही दुजाभाव होत असल्याचा आरोप खोत यांनी केला. ज्या भागात शिवसेनेची सत्ता आहे, तिथे विकासनिधीला कात्री लावण्यात आली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसैनिकांना किती विकास निधी दिला, हे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. एबी फॉर्म वाटपातील गोंधळावर सरनाईक यांनी ही पिंगळेंची चूक असल्याचे मान्य केले होते, तरीही कारवाईऐवजी त्यांना बढती दिल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
तानाजीराव सावंत यांना नेतृत्व देण्याची मागणी
भूम आणि परंडा नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आ. राणा पाटील यांचे नातेवाईक माजी आमदार राहुल मोटे, भाजप आणि उद्धव ठाकरे गट यांनी एकत्र येऊन प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना संपवण्याचे कारस्थान रचले होते. मात्र, सावंत यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना वाचवायची असेल आणि ती भाजपच्या घशात जाऊ द्यायची नसेल, तर जिल्ह्याचे नेतृत्व तानाजीराव सावंत यांच्याकडेच दिले पाहिजे, अशी आग्रही मागणी ॲड. खोत यांनी शेवटी केली.




