मुरुम : उमरगा तालुक्यातील आलुर येथे घरातील सामान आणि आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३६ वर्षीय व्यक्तीला चौघांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर, पीडित व्यक्तीला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. ही घटना २० मे २०२५ रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन खिरु राठोड (वय ३६ वर्षे, रा. आलुर, ता. उमरगा) असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आलुर येथे मोहन राठोड यांना आरोपी राजाराम खिरु राठोड, नितेश राजाराम राठोड, रोहित राजाराम राठोड आणि अनुसया राजाराम राठोड (सर्व रा. आलुर) यांनी घरातील सामान व आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन आरोपींनी मोहन यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेप्रकरणी दत्ता खांडेकर यांनी २७ मे २०२५ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजाराम राठोड, नितेश राठोड, रोहित राठोड आणि अनुसया राठोड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मुरुम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे आलुर परिसरात खळबळ उडाली आहे.