मंडळी, अहो ऐकलंत का? महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा साक्षात्कार झाला आहे. परतूर विधानसभेचे आमदार आणि आपले लाडके वाचाळवीर, बबनराव लोणीकर यांनी आपल्या डोळ्यांवरचा अज्ञानाचा पडदा दूर केला आहे. आपण आजवर समजत होतो की आपल्या आईला पगार तिच्या नोकरीमुळे मिळतो, बापाला पेन्शन त्याच्या आयुष्यभराच्या सेवेमुळे आणि पेरणीसाठी मिळणारे सहा हजार रुपये हे सरकारी धोरण आहे. पण छे! हा सगळा आपला भाबडेपणा. बबनरावांच्या ज्ञानाच्या दिव्य प्रकाशानुसार, हे सगळं, अगदी आपल्या अंगावरचे कपडे आणि हातातल्या मोबाईलसकट, थेट ‘मोदीजींच्या कृपेचा प्रसाद’ आहे.
धन्य झाले बबनराव! तुमच्या या साक्षात्कारामुळे आमचा केवढा मोठा गैरसमज दूर झाला. नाहीतर आम्ही उगाच कष्ट, शिक्षण आणि नशिबाला धन्यवाद देत बसलो होतो. आता कळलं की, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही करतो, ते मोदीजींच्याच कृपेने. त्यामुळे, उद्यापासून घरात पोळ्या करपल्या किंवा गाडी पंक्चर झाली, तर थेट मोदीजींना जबाबदार धरायला आम्ही मोकळे! बबनरावांनी तर हे सांगून एकप्रकारे ‘वन नेशन, वन ब्लेम’ (One Nation, One Blame) योजनेचा पायाच रचला आहे.
या महान शोधानंतर अपेक्षेप्रमाणे सोशल मीडियावर बबनरावांचा ‘ट्रोल-अभिषेक’ सुरू झाला. चौफेर टीकेचा भडीमार झाल्यावर साहेबांनी माफी मागितली. पण कशी? “मी चुकलो नसलो तरी माफी मागतो” या वाक्याने! अहाहा! काय हा अहंकार! याला म्हणतात ‘अहंकारी माफीनामा’. जगातल्या सर्वोत्कृष्ट विनोदांच्या पुस्तकात या वाक्याला मानाचं पान मिळायला हवं. यापुढे कुणी चुकलं तर सरळ म्हणावं, “मी चुकलो नाही, पण तुझा गैरसमज दूर करण्यासाठी सॉरी म्हणतो.” बबनरावांनी माफीनाम्याचा नवा प्रकार शोधून काढलाय, याबद्दल खरंतर त्यांना पेटंट द्यायला हवं.
आणि हो, त्यांनी म्हणे रक्ताने पत्र लिहून माफी मागितली. व्वा! काय ही नाट्यमयता! आम्हाला तर शंका आहे की, ज्या रक्तानं त्यांनी हे पत्र लिहिलं, त्यातला माणुसकीचा ‘हिमोग्लोबिन’ कधीच संपलेला दिसतोय. पुढच्या वेळी बबनरावांनी रक्ताचं पत्र लिहिण्याऐवजी रक्तदान शिबिर आयोजित करावं, म्हणजे निदान कुणा गरजू रुग्णाचं भलं तरी होईल. अशा दिखाऊपणाने शेतकऱ्यांच्या जखमा भरत नसतात, उलट त्या आणखी चिवडल्या जातात.
मुख्यमंत्री म्हणतात, ‘त्यांना समज दिली जाईल.’ ही तर त्याहून मोठी थट्टा. असं वाटतंय की सत्ताधारी पक्षाकडे ‘समज-पुरवठा’ विभाग आहे, जो दर निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना विसरणाऱ्या नेत्यांना ठोक प्रमाणात ‘समज’ पुरवतो. पण ही ‘समज’ बहुतेक ‘यूज अँड थ्रो’ प्रकारची असावी, कारण प्रत्येक वेळी कुणीतरी नवीन नेता शेतकऱ्याला ‘फुकटखाऊ’ ठरवतो आणि पुन्हा एकदा ‘समज’ देण्याचा कार्यक्रम सुरू होतो.
बबनराव आणि त्यांच्यासारख्या नेत्यांना एक गोष्ट कळत नाही. शेतकऱ्याला मिळणारी सरकारी मदत ही भीक नाही, तो त्याचा हक्क आहे. तो या मातीत सोनं पिकवतो म्हणूनच तुमच्या-आमच्या ताटात भाकर येते. तो पेरतो, म्हणूनच तुम्ही सत्तेचं राजकारण करू शकता. नाहीतर पाण्यासोबत माती खाण्याची वेळ आली असती. तुम्ही दिलेला मोबाईल कदाचित उद्या बंद पडेल, पण शेतकऱ्याने पिकवलेलं धान्यच तुमचं पोट भरेल.
शेतकरी आज शांत आहे, पण तो तुमचा सगळा हिशोब त्याच्या मनातल्या वहीत लिहून ठेवत आहे. त्याच्या हातात भलेही महागडा मोबाईल नसेल, पण त्याच्या बोटाला लागलेली निवडणुकीची शाई ही कोणत्याही ज्वालामुखीपेक्षा कमी नाही. लक्षात ठेवा बबनराव, तुम्ही ज्या रक्ताने माफीनामा लिहिला, त्यापेक्षा शेतकऱ्याच्या बोटावरची शाई अधिक शक्तिशाली आहे. ती जेव्हा बोलते, तेव्हा मोठमोठ्यांचे राजकीय मुखवटे वितळून जातात.
त्यामुळे, पुढच्या वेळी शेतकऱ्यांवर उपकाराचे ओझे लादण्याआधी लक्षात ठेवा, हीच माती आहे जी धान्य पिकवते आणि हीच माती एक दिवस तुमचं सत्तेचं राजकारण गाडूनही टाकू शकते! तयारी ठेवा!
– बोरूबहाद्दर