धाराशिवच्या एका शासकीय अधिकाऱ्याचा तो फोन आला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. “साहेब, जरा अलर्ट राहा,” तो अधिकारी दबक्या आवाजात म्हणाला. “तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा कट शिजतोय.” मी क्षणभर स्तब्ध झालो. मी? खंडणी? ज्याने आयुष्यभर सत्याची कास धरली, ज्याने निर्भीडपणे समाजासमोर वास्तव मांडलं, त्याच्यावर असा आरोप? हा निव्वळ हास्यास्पद प्रकार होता. पण वास्तव हे अनेकदा कल्पनेपेक्षाही विचित्र असतं, हेच खरं.
मी त्या अधिकाऱ्याला विचारलं, “मी कुणाला खंडणी मागितली? आणि मी कधी मागणारही नाही. सत्य बोलणं, सत्य लिहिणं हा जर गुन्हा असेल, तर तो गुन्हा मी हजारवेळा करेन!” त्यावर तो अधिकारी हताशपणे म्हणाला, “साहेब, लोकांना सत्य पचत नाही. तुमचं सत्य लिखाणच त्यांच्या डोळ्यात खुपतंय.” कोण आहेत हे लोक? सत्ताधारी पक्षाचे दोन चमचे आणि त्यांना साथ देणारा एक पोलीस अधिकारी! व्वा! लोकशाहीचे हेच ते आधारस्तंभ!
सोमवार, १९ मे रोजी आलेला तो फोन माझ्या डोक्यात चक्रासारखा फिरत होता. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा हा काही पहिला डाव नाही. तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण असो, जिल्हा नियोजन समितीच्या २६८ कोटींच्या कामांना दिलेली स्थगिती असो, धाराशिव शहरातील १४० कोटींचं रस्ते प्रकरण असो किंवा तुळजापूरचं आठ कोटींचं बस स्टँड प्रकरण असो; ‘धाराशिव लाइव्ह’ने निर्भीडपणे सत्य जनतेसमोर मांडलं. आणि याच सत्यामुळे सत्ताधारी नेत्याच्या पोटात दुखायला लागलं. आता त्याच नेत्याचे चमचे मला खोट्या गुन्ह्यात अडकवून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
गेली ३५ वर्षे मी पत्रकारितेत आहे. ‘केसरी’, ‘लोकमत’, ‘एकमत’, ‘लोकसत्ता’ अशा मान्यवर दैनिकांत मी काम केलंय. १३ वर्षांपूर्वी ‘धाराशिव लाइव्ह’ हे माझं स्वतःचं डिजिटल चॅनल सुरू केलं. निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड बातम्या देणं, हेच आमचं ब्रीद. आम्ही कुणाचा मुलाहिजा बाळगत नाही. जर सत्य बातम्या देणं हा गुन्हा असेल, तर हो, मी गुन्हेगार आहे! आणि हा गुन्हा मी पुन्हा पुन्हा करेन, पण कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.
याआधीही मला ट्रोल करण्यात आलं, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. आता तर थेट खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही भिणार नाही, आम्ही हटणार नाही! सत्य कधी लपत नाही आणि सत्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. असल्या धमक्यांनी आणि खोट्या आरोपांनी जर कुणी विचार करत असेल की आम्ही गप्प बसू, तर तो त्यांचा भ्रम आहे. आमची लेखणी तळपत्या तलवारीसारखी आहे, जी भ्रष्टाचारावर आणि अन्यायावर वार करतच राहील. ये पब्लिक है, सब जानती है!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह