परंडा : “आमच्या नादाला लागल्यास जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत देवळाली (ता. भूम) येथे एका ४० वर्षीय व्यक्तीवर पाच जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना १४ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता देवळाली येथील भवानी हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी २१ मे २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय नामदेव लष्कर (वय ४० वर्षे, रा. देवळाली, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रकाश भागवत गोरे, दिनकर भागवत गोरे, विकास गुलाब माळी, भागवत फकीरा गोरे आणि श्रीहरी उर्फ शशिकांत घाडगे (सर्व रा. देवळाली, ता. भूम) यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली. “काय बघतोस?” असे म्हणून आरोपींनी संजय लष्कर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने आणि चाकूने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, “तू जर आमच्या नादाला लागला तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
घटनेनंतर सात दिवसांनी संजय लष्कर यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे देवळाली परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.