धाराशिव – धाराशिव तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भरधाव टमटम उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, चालकासह आठ जण जखमी झाले आहेत. शारदा दत्ता खैरे असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना ३१ मे रोजी घडली असून, याप्रकरणी टमटम चालकाविरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ३१ मे २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चालक हनुमंत रामचंद्र गवळी (रा. जुनोनी) हा आपल्या ताब्यातील टमटम (क्र. एमएच २५ एन १२७७) घेऊन चालला होता. गाडी भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत असल्यामुळे जुनोनी गावातील अकबर शेख यांच्या घराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टमटम पलटी झाले.
या अपघातात टमटममधील प्रवासी शारदा दत्ता खैरे या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच, गाडीतील इतर प्रवासी किसकिंदा गायकवाड, रुपाली गायकवाड, सई संतोष, राजाबाई गवळी, अमोल सोनवणे, शितल गवळी, आदित्य गवळी आणि स्वतः चालक हनुमंत गवळी हे देखील किरकोळ व गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी मयत शारदा यांचे पती दत्ता नरसू खैरे (वय ५५) यांनी ६ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून चालक हनुमंत गवळी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.