धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ मारामारीत झाले. ही घटना धाराशिव तालुक्यातील सुर्डी शिवारात घडली असून, याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्डी येथील शेत गट क्रमांक २१३ मध्ये २७ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पहिल्या घटनेत, कमल गोवर्धन माळी (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे म्हशीचे वासरू शेतात आल्याच्या कारणावरून बाळू दगडू माळी, दगडू पांडुरंग माळी आणि जया दगडू माळी यांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकीही दिली. या तक्रारीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत, जयश्री दगडू माळी (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, म्हशीचे वासरू सोयाबीनच्या पिकात का सोडले, असे विचारल्याचा राग मनात धरून गोवर्धन पांडुरंग माळी, कमल गोवर्धन माळी आणि मारुती गोवर्धन माळी यांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
दोन्ही पक्षांनी ३० जुलै रोजी दिलेल्या तक्रारींच्या आधारे, धाराशिव ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटांतील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३(५)) गुन्हे दाखल केले आहेत. एकाच घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.