धाराशिव – तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील कथित सूत्रधार, विनोद उर्फ पिटू गंगणे याला आज (९ जून) पुन्हा न्यायालयात हजर केले असता, अत्यंत नाट्यमय आणि अनपेक्षित घडामोडी घडल्या. पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत न्यायालयाने तपास यंत्रणेला अक्षरशः धारेवर धरले. “तुमचं चाललंय तरी काय? तुम्हाला आरोपीला वाचवायचे आहे का? तसे असेल तर सांगा,” अशा थेट आणि तिखट शब्दांत न्यायाधीशांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. अखेर, न्यायालयाने गंगणेला तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली असली, तरी या प्रकरणाच्या तपासावरच आता संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे.
न्यायालयातील नाट्य: कलम हटवले, अधिकारी गैरहजर
मागील सुनावणीत गंगणेवर ड्रग्ज ‘तस्करीचा कट रचणे आणि इतरांना प्रोत्साहन देणे’ यासाठी कलम २९ लावून मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांनी आज मात्र कोलांटी उडी मारली. आज न्यायालयात रिमांड अर्ज दाखल करताना पोलिसांनी कलम २९ चा उल्लेख टाळून, केवळ ड्रग्ज सेवनाचे (कलम २७) सौम्य कलम लावून ३ दिवसांचीच कोठडी मागितली.
या प्रकारामुळे न्यायालय चांगलेच संतापले. इतर आरोपींना १४ दिवसांची कोठडी मागणारे पोलीस गंगणेच्या बाबतीत इतकी वेगळी भूमिका का घेत आहेत, असा सवाल न्यायाधीश मिटकरी मॅडम यांनी केला.
मुख्य तपास अधिकारी गोकुळ ठाकूर आज पुन्हा न्यायालत गैरहजर होते. त्यांच्या जागी आलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाडेने प्रकरणातील काहीही माहिती नसल्याचे सांगितल्याने न्यायालयाचा पारा आणखीनच चढला.
न्यायालयाचे पोलिसांना तिखट सवाल:
- “तुम्हाला आरोपीला वाचवायचे आहे का?”: मागील सुनावणीत कटाचा आरोप आणि आज केवळ सेवनाचा आरोप, हा बदल का? यावरून न्यायालयाने पोलिसांच्या हेतूवरच थेट संशय व्यक्त केला.
- “राजकीय दबाव होता का?”: गंगणे एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे त्याला मदत केली जात आहे का? त्याला तस्कर गटात न टाकता सेवन करणाऱ्यांच्या गटात का ठेवले? असा प्रश्न मागील सुनावणीत विचारला असता तपास अधिकारी गोकुळ ठाकूर निरुत्तर राहिले होते, याची आठवण न्यायालयाने करून दिली.
- गहाळ मोबाईलचे काय?: प्रकरणात नाव आल्यानंतर गंगणेचे दोन मोबाईल गहाळ झाले आणि त्याबाबत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला. ते अत्यंत महत्त्वाचे पुरावे असलेले मोबाईल अद्याप जप्त का नाहीत? असा जाब कोर्टाने विचारला.
तपासावर प्रश्नचिन्ह: पुढे काय?
एकीकडे गंगणेच्या पोलीस कोठडीत वाढ झाली असली तरी, आजच्या सुनावणीने पोलिसांच्या तपासालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. कटकारस्थानाचा गंभीर आरोप अचानक काढून टाकणे, मुख्य तपास अधिकाऱ्याची सततची गैरहजेरी, आणि राजकीय दबावाच्या प्रश्नावर पोलिसांचे मौन, या सर्व बाबींमुळे हा तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही, याबद्दल मोठी शंका निर्माण झाली आहे.
आता या वाढीव तीन दिवसांच्या कोठडीत पोलीस काय दिवे लावतात आणि न्यायालयाच्या संशयाचे निरसन करण्यासाठी कोणते पुरावे सादर करतात, यावर या हाय-प्रोफाईल प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे.