धाराशिव – शेताच्या बांधावरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या आईला दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी कोयत्याने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील वरुडा येथे घडली. याप्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सचिन लिंबराज गाढवे (वय २४ वर्षे, रा. वरुडा, ता. जि. धाराशिव) यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी रात्री (पहाटे) दीड वाजण्याच्या सुमारास वरुडा गावामध्ये आरोपी अजित भुजंग गाढवे आणि मुद्रुका भुजंग गाढवे (दोघे रा. वरुडा) यांनी सचिन गाढवे व त्यांच्या आईला अडवले.
‘शेताचा बांध का टोकरला?’ या कारणावरून आरोपींनी सचिन आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी लोखंडी कोयता आणि लाकडी दांडक्याने दोघांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यानंतर सचिन गाढवे यांनी दि. ९ एप्रिल २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजित गाढवे आणि मुद्रुका गाढवे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११८(१), ११५(२), २९६, ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शेतीच्या किरकोळ वादातून झालेल्या या गंभीर मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.