धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी पोलिसांचा एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद कारभार चव्हाट्यावर आला आहे. एका गंभीर ‘नार्कोटिक्स ड्रग्ज’ (अमली पदार्थ) प्रकरणात भक्कम पुरावे आणि साक्षीदार उपलब्ध असतानाही, पोलिसांनी चक्क काही मुख्य आरोपींची नावेच वगळून त्यांना पाठीशी घालण्याचे मोठे पाप केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नाही, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांनी काही आरोपींनाच चक्क ‘साक्षीदार’ बनवल्याचा संतापजनक आरोप होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२/२०२५ अन्वये हा ड्रग्जचा गुन्हा दाखल आहे. सध्या हे प्रकरण उस्मानाबाद (धाराशिव) येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयात स्पेशल केस (२६/२०२५) म्हणून न्यायप्रविष्ट आहे. मात्र, या तपासात पोलिसांनी मोठी ‘अर्थपूर्ण’ तडजोड केल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे. कारण, ड्रग्ज सारख्या समाजाला पोखरणाऱ्या गुन्ह्यात पुरावे डोळ्यासमोर असतानाही काही आरोपींची नावे आरोपपत्रातून जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत. यावरून पोलिसांचे आणि ड्रग माफियांचे काही साटेलोटे तर नाही ना? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी:
या भयंकर आणि भ्रष्ट तपासाविरुद्ध तुळजापूर येथील जनहित नगरचे रहिवासी श्री. रविंद्र ज्ञानोबा साळुंके यांनी थेट जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास या स्थानिक पोलिसांकडून काढून घेण्यात यावा आणि एखाद्या उच्चपदस्थ ‘आयपीएस’ (IPS) अधिकाऱ्यामार्फत याची सखोल व निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी आक्रमक मागणी साळुंके यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणात तत्काळ पुरवणी आरोपपत्र (Supplementary Chargesheet) दाखल करून सुटलेल्या त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक कारवाई करणार का?
आता खुद्द जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना या अर्जावर तात्काळ आणि नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता धाराशिवचे पोलीस अधीक्षक या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, आरोपींना वाचवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार का? आणि ड्रग्ज प्रकरणात सत्य बाहेर आणण्यासाठी उच्चस्तरीय IPS चौकशीचे आदेश देणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.







