धाराशिव – शहरातील देवी मंदिराच्या पाठीमागे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची धाराशिव शहर पोलिसांनी सुटका केली आहे. अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीची ही जनावरे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, ५ जून २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास देवी मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत काही जनावरे बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, त्या ठिकाणी ११ गायी, कालवडी आणि खोंड चारा-पाण्याची व्यवस्था न करता निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन जावेद जलील सय्यद (वय ३८, रा. ख्वाजा नगर, धाराशिव) याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.
बेंबळी पोलिसांची कारवाई: कत्तलीसाठी होणारी बैलांची अवैध वाहतूक रोखली; एकावर गुन्हा दाखल
बेंबळी – कत्तलीच्या उद्देशाने वाहनातून बैलांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या एका तरुणावर बेंबळी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी उजणी टी-पॉईंट येथे वाहन अडवून सुमारे १ लाख रुपये किमतीचे चार बैल जप्त केले असून, आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेंबळी पोलीस शुक्रवारी, ६ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी उजणी टी-पॉईंट येथे एक वाहन (क्र. एमएच १३ सीजे १३५३) संशयितरित्या जाताना दिसले. पोलिसांनी ते वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये चार बैल चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयीपणे कोंबून भरल्याचे आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ वाहन आणि त्यातील चारही बैल जप्त केले. चौकशी केली असता वाहनचालकाचे नाव प्रसाद लहू मोरे (वय १९, रा. खेड, ता. लोहारा) असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी प्रसाद मोरे विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.