धाराशिव : धाराशिव नगरपालिकेला नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर झालेल्या 140 कोटी रुपये निधीच्या 59 डीपी रस्त्यांच्या कामांना कंत्राटदारांच्या हव्यासापोटी जाणूनबुजून अडथळा येत असल्याचा संतापजनक आरोप करत महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचा ढिसाळपणा – कंत्राटदारांचा लुटमारीचा डाव
नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांच्या निधीच्या रस्ते कामांना प्रशासकीय मंजुरी 23 फेब्रुवारी 2024 रोजीच मिळाली होती. नियमानुसार सात दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करून तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे आवश्यक होते. मात्र, सत्ताधारी आणि कंत्राटदारांच्या मिलीभगतीमुळे कामे रखडली आहेत.
रास्ता रोको आंदोलन – पण तरीही फक्त खोटी आश्वासने
दि. 6 जानेवारी 2025 रोजी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यांची कामे तत्काळ चालू करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलनावेळी धाराशिव नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. तथापि, सात महिने उलटूनही कामे सुरू न होणे म्हणजे नागरिकांची सरळसरळ फसवणूकच आहे.
कंत्राटदारांचा हव्यास – सत्ताधाऱ्यांची ढाल
महाविकास आघाडीने ठणकावून सांगितले की, कंत्राटदारांकडून 15 ते 16 टक्के जास्तीच्या दराने निविदा मंजूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या आडून कंत्राटदार प्रशासनावर दबाव आणत आहेत. या निविदांमुळे नगर परिषदेला जवळपास 35 ते 40 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचा आक्रमक इशारा – आमरण उपोषण होणार
महाविकास आघाडीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देऊन तात्काळ कामांना सुरुवात करावी. अन्यथा दि. 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल.
लोकप्रतिनिधींचा गप्पपणा – धाराशिवकर संतप्त
धाराशिवकरांनी विचारले आहे की, सत्ताधारी नेते आणि लोकप्रतिनिधी या भ्रष्ट कारभारावर का गप्प आहेत? कंत्राटदारांच्या नफेखोरीला पाठीशी घालून धाराशिवकरांच्या विश्वासाचा छळ का होत आहे? प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची ही बेफिकीरी सहन केली जाणार नाही.
महाविकास आघाडीची मागणी – ठोस कारवाईची मागणी
महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कडक मागणी केली आहे की, तात्काळ याची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अन्यथा प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.
धाराशिवकरांना आता फक्त एकच प्रश्न पडला आहे – रस्ते कधी होणार? भ्रष्टाचार कधी थांबणार?