धाराशिव: येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० जुलै २०२५ रोजी अंबेजवळगा तांडा येथे घडली असून, याप्रकरणी महादेव मोतीराम राठोड यांनी ११ जुलै २०२५ रोजी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव राठोड यांचा भाऊ एका मुलीला पळवून घेऊन गेल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपी उमेश सिद्राम राठोड, संकेत रामचंद्र चव्हाण, सिंधू रामचंद्र चव्हाण, दिपक लिंबा राठोड, रमेश सिद्राम राठोड, लिंबा राठोड आणि बाया लिंबा राठोड (सर्व रा. अंबेजवळगा तांडा, ता. जि. धाराशिव) यांनी कायदेशीर मंडळी जमवून फिर्यादी महादेव राठोड आणि दत्ता पवार यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि दत्ता पवार यांना लाथाबुक्क्यांनी, वायर, रॉड, दगड आणि कोयत्याने जबर मारहाण करून जखमी केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आत्यालाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले व फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






