उमरगा : तालुक्यातील सावळसुर शिवारात चार वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमधून खते, सोयाबीन, तूर आणि फवारणीची औषधे असा एकूण ६८,४४६ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी १५ जून रोजी सायंकाळी ७ ते १६ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी पांडुरंग दयानंद माने (वय २९, रा. माडज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सावळसुर शिवारातील त्यांच्या शेडमधून चोरट्याने खते, सोयाबीन बॅग, तुरीची बॅग आणि फवारणीची औषधे असा एकूण ३८,१८० रुपयांचा माल चोरला.
याचबरोबर, चोरट्याने उद्धव देविदास माने यांच्या शेडमधून १४,४०० रुपये किमतीच्या सोयाबीन बॅग, मधुकर लक्ष्मण माने यांच्या शेडमधून ५,९६६ रुपये किमतीच्या सोयाबीन बॅग व खते, आणि अरुण लक्ष्मण शिंदे यांच्या शेडमधून ९,९०० रुपये किमतीच्या सोयाबीन व खताच्या बॅग चोरून नेल्या.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पांडुरंग माने यांनी १९ जून २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३४(१) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू केला आहे.