धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात वाहनचोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, अवघ्या काही दिवसांत दोन मोटारसायकलींसह चक्क कांद्याने भरलेला एक भलामोठा ट्रक चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तुळजापूर, उमरगा आणि धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. एकाच दिवशी (२० जून) या तिन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
यातील सर्वात मोठी चोरी धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. नागनाथ अमृत वाघे (वय २७, रा. अणदुर) यांनी त्यांचा अंदाजे २६ लाख रुपये किमतीचा चौदा चाकी अशोक लेलँड ट्रक (क्र. केए ५६-३४६९) वडगाव शिवाराजवळ रस्त्याच्या कडेला उभा केला होता. ट्रकमध्ये ३० टन कांदा भरलेला होता. २० जून रोजी पहाटे चारच्या सुमारास ते जवळच्या हॉटेलमध्ये फ्रेश होण्यासाठी गेले असता, अज्ञात चोराने कांद्यासह संपूर्ण ट्रकच चोरून नेला. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी घटना तुळजापूर येथे घडली. कुशाल शशिकांत नाईकवाडी (वय २४, रा. तुळजापूर) यांची ३० हजार रुपये किमतीची डिस्कव्हर मोटारसायकल (क्र. एमएच १२ जीएम २०७९) ५ जून रोजी रात्री ११ वाजता सोडा सेंटरच्या समोरून चोरीला गेली. याबाबत २० जून रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तिसरी घटना उमरगा शहरात घडली. यशवंत वसंतराव मुळे (वय ३७, रा. साईधाम कॉलनी, उमरगा) यांची २० हजार रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्र. एमएच २५ एएन ३०४८) १७ जून रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास एका दुकानासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणीही २० जून रोजी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
या तिन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.