धाराशिव: मंडळी, आनंदाची बातमी! (की नेहमीचीच, हे तुम्हीच ठरवा!) आपल्या धाराशिव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कृष्णा खोऱ्यातून जे ७ टीएमसी पाणी येणार आहे, त्यासाठी आता आपल्याला फक्त डिसेंबर २०२५ पर्यंत वाट पाहायची आहे! होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. आपले लाडके आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही नवी ‘डेडलाईन’ जाहीर केली आहे. मागच्या वेळेस जून-जुलै, मग डिसेंबर २०२४ च्या तारखा जरा ‘हुकल्या’, पण यावेळी मात्र पाणी रामदरा तलावात पडणारच, असा ठाम विश्वास (पुन्हा एकदा) आमदारसाहेबांनी व्यक्त केला आहे.
रविवारी (दिनांक ११) आमदार पाटील यांनी घाटणे बॅरेज येथील भोयर पंपगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अधीक्षक अभियंता थोरात आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तब्बल ९०% काम पूर्ण झाल्याची गोड बातमी त्यांनी दिली. उरलेल्या १०% कामात पुढच्या तीन महिन्यांत पंप बसवले जातील आणि मग काय, डिसेंबरअखेरपर्यंत उजनीचं पाणी थेट रामदरा तलावात खळाळणार! (टाळ्या!)
‘तारीख पे तारीख’ आणि वाढता खर्च:
आता थोडं इतिहासात डोकावूया. २००४ सालापासून हे कृष्णा खोऱ्याच्या पाण्याचे ‘गाजर’ आपल्यासमोर नाचवले जात आहे. सुरुवातीला या योजनेचा खर्च होता फक्त ४ हजार ७०० कोटी रुपये. पण जसजशा कामाला ‘तांत्रिक अडचणी’ येत गेल्या (आणि तारखा पुढे ढकलल्या गेल्या), तसतसा हा खर्च आता तब्बल १२ हजार ७०० कोटींवर जाऊन पोहोचला आहे! म्हणजे जवळपास तिप्पट! असो, विकासासाठी एवढा खर्च तर लागतोच, नाही का?
मागच्या वेळेसचा ‘राडा’ आठवतोय?
आठवण करून देतो की, विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार राणा पाटील यांनी डिसेंबर २०२४ मध्ये पाणी येणार म्हणून रामदरा पंप हाऊसचे उद्घाटनही करून टाकले होते. तेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्यासोबत त्यांचा जो ‘राडा’ झाला होता, तोही जिल्हावासियांना चांगलाच स्मरणात असेल. मधल्या काळात सिंदफळ तलावात ‘टेस्टिंग’ करून वेळ मारून नेण्यात आली होती.
आता फक्त एकच सवाल:
आमदारसाहेबांनी आता डिसेंबर २०२५ ची नवी तारीख दिली आहे. पण जनतेच्या मनात एकच सवाल आहे – ही ‘अखेरची’ तारीख असेल ना? की पुन्हा एकदा “पुढच्या वर्षी लवकरच” किंवा “काही तांत्रिक अडचणींमुळे…” अशी आश्वासने ऐकायला मिळतील? तोपर्यंत धाराशिवकरांनो, पाण्याची काटकसर करत राहा आणि २०२५ च्या डिसेंबरची आतुरतेने वाट पाहा! काय माहीत, नळाला पाणी आलंच तर!