धाराशिव: – तालुक्यातील धारूर गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ३१ वर्षीय तरुणाला लोखंडी पाईप आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हणमंत जगताप (वय ३१, रा. धारूर, ता. जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ५:३० वाजण्याच्या सुमारास धारूर येथील जिल्हा परिषद शाळेसमोर ही घटना घडली. गावातीलच आरोपी आकाश शिवाजी कामठे आणि अमोल अनिल कामठे यांनी नितीन जगताप यांना मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
नितीन जगताप यांनी २ मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी आरोपी आकाश कामठे आणि अमोल कामठे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.