दुधाळवाडी (ता. कळंब ) – खासगी शाळांच्या वाढत्या आकर्षणाला आणि ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना वाचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील दुधाळवाडी ग्रामपंचायतीने एक अभिनव आणि अत्यंत प्रभावी उपाय शोधून काढला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुला-मुलींना प्रवेश देणाऱ्या पालकांची संपूर्ण घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय ग्रामपंचायतीने जाहीर केला आहे.
वाढत्या महागाईच्या काळात अनेक पालक खासगी शाळांच्या शुल्कामुळे त्रस्त आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत चालल्या आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा म्हणून, सरपंच सौ. सावित्री उर्फ सविता भिवाजी सिरसट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही ‘करमुक्त शिक्षण’ योजना जाहीर केली आहे. ग्रामपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या जाहीर आवाहनानुसार, जे ग्रामस्थ आपल्या पाल्यांना दुधाळवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश देतील, त्यांना कर माफीचा थेट लाभ मिळणार आहे.
या अनोख्या उपक्रमाला उपसरपंच सौ. कस्तुरबाई शिवाजी लाटे आणि ग्रामसेवक यांचेही पूर्ण समर्थन आहे. ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ यांसारख्या घोषणांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या ग्रामपंचायतीने आता शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद मानले जात आहे.
एकीकडे पालकांच्या खिशावरील आर्थिक भार कमी करणे आणि दुसरीकडे सरकारी शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे त्यांना पुन्हा आकर्षित करणे, हा या योजनेमागील दुहेरी उद्देश आहे. दुधाळवाडीचा हा ‘एका हाताने प्रवेश द्या, दुसऱ्या हाताने करमाफी घ्या’ पॅटर्न राज्यातील इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.