शुक्रवारची संध्याकाळ. धाराशिवच्या न्यायालयाच्या आवारात जे घडले, ते केवळ एका हाय-प्रोफाईल गुन्हेगाराच्या अटकेचे नाट्य नव्हते; ते पोखरलेल्या व्यवस्थेवर कायद्याने मारलेला निर्णायक हातोडा होता. महाराष्ट्राची धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरला ड्रग्जचा जो कलंक लागला होता, त्याचा कथित सूत्रधार, राजकीय वरदहस्त लाभलेला विनोद उर्फ पिटू गंगणे याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. ही अटक म्हणजे केवळ एका प्रकरणाचा टप्पा नाही, तर ‘उडता पंजाब’च्या वाटेवर निघालेल्या महाराष्ट्रासाठी एक गंभीर इशारा आणि तितकीच मोठी संधी आहे.
एका गुन्हेगाराची मुजोरी इतकी वाढते की, तो केवळ ड्रग्जचा व्यापार करत नाही, तर संपूर्ण शहराला वेठीस धरतो. माजी नगराध्यक्षाचा पती आणि स्थानिक आमदाराचा ‘लाडका कार्यकर्ता’ ही त्याची ओळखच त्याच्या ताकदीचे आणि या प्रकरणाच्या गांभीर्याचे द्योतक आहे. सुरुवातीला याच प्रकरणाचा तपास ज्या ढिसाळपणे सुरू होता, तो याच राजकीय लागेबांध्यांचा परिणाम होता का, ही शंका आता अधिक गडद झाली आहे. “ड्रग्ज सोडल्याने खोकला येतो” असा हास्यास्पद युक्तिवाद न्यायालयात केला जातो आणि तो काही काळासाठी का होईना, ग्राह्य धरला जातो, हे व्यवस्थेच्या कोणत्या अध:पतनाचे लक्षण आहे? यातूनच गुन्हेगारांचे फावते आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास उडू लागतो.
मात्र, याच अंधारात आशेचा किरण दिसला. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासारख्या कणखर अधिकाऱ्याने सूत्रे हाती घेतल्यानंतर आणि ऍड. महेंद्र देशमुख यांनी सरकारी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडल्यानंतर चित्र पालटले. ज्या पोलिसांनी सुरुवातीला ढिलाई दाखवली, त्याच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यातून एक गोष्ट सिद्ध होते – व्यवस्था तीच असते, अधिकारी तेच असतात; फरक पडतो तो फक्त राजकीय इच्छाशक्तीचा आणि निःपक्षपातीपणे काम करण्याच्या स्वातंत्र्याचा. आजची कारवाई ही निःसंशयपणे या दोन अधिकाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा विजय आहे.
पिटू गंगणेची अटक ही केवळ सुरुवात आहे. खरा आनंद तेव्हा साजरा होईल, जेव्हा या रॅकेटच्या मुळावर घाव घातला जाईल. या प्रकरणात गंगणे हा केवळ एक चेहरा आहे; त्याच्यामागे पैशाचे डोंगर उभे करणारे, त्याला राजकीय संरक्षण देणारे आणि या काळ्या धंद्यातून आपली घरे भरणारे ‘पांढरपेशा’ कोण आहेत, हे जनतेसमोर येणे अत्यावश्यक आहे. तपास यंत्रणेवर आता प्रचंड मोठी जबाबदारी आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, या प्रकरणाचा तपास त्याच्या तार्किक अंतापर्यंत नेला पाहिजे. गंगणेच्या अटकेने समाधान मानणाऱ्या जनतेला, त्याच्यामागे उभ्या असलेल्या अदृश्य हातांवरही बेड्या पडलेल्या बघायच्या आहेत.
ही घटना महाराष्ट्रातील प्रत्येक शहरासाठी आणि गावासाठी एक धडा आहे. आपल्या मुला-बाळांना नशेच्या गर्तेत ढकलणारी ही कीड वेळीच ठेचली नाही, तर ती संपूर्ण समाज पोखरून काढेल. तुळजापूरच्या या प्रकरणात कायद्याने आपली ताकद दाखवली आहे. आता हीच ताकद, हीच निर्भयता आणि हीच पारदर्शकता कायम ठेवण्याची गरज आहे. गंगणेची अटक ही केवळ एका गुन्हेगाराची अटक न राहता, व्यवस्थेच्या शुद्धीकरणाची आणि गुन्हेगारी-राजकारण युतीच्या अंताची नांदी ठरो, हीच अपेक्षा.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह